विशेष प्रतिनिधी
बांग्लादेश : बांग्लादेशातील इस्कॉन मंदिराचे चिन्मय कृष्ण दास यांना बांग्लादेश पोलिसांनी ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात निदर्शने आणि शांतता सभा आयोजित केल्या जात आहेत. मात्र, या सभा कट्टरपंथीय गटांच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरत आहेत. ISKCON’s Chinmoy Krishna Das arrested
सोमवारी चिन्मय प्रभूंना अटक केल्यानंतर देशभरात हिंदू समाजाने शांतता सभांचे आयोजन केले होते. चटगावच्या इस्कॉन पुंडरीक धाम मंदिराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या चिन्मय प्रभू हे हिंदू अल्पसंख्याकांच्या न्यायासाठी व त्यांच्या हक्कांसाठी काम करत होते. मात्र, त्यांच्या अटकेमुळे अल्पसंख्याक समुदायाने संताप व्यक्त केला.
शांतता सभांवर कट्टरपंथीयांनी हल्ले करत देशभरात वातावरण तणावपूर्ण केले. चटगाव, शाहबाग, आणि मौलवी बाजारसह विविध भागांमध्ये हिंदू समुदायावर क्रूर हल्ले झाले. कट्टरपंथीय गटांच्या या हिंसक हल्ल्यांमध्ये ५० पेक्षा जास्त हिंदू जखमी झाले आहेत.
ढाक्यातील शाहबाग येथे आयोजित शांतता सभेदरम्यान कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात चटगाव विश्वविद्यालयाचे प्राध्यापक कुशाल बरन गंभीर जखमी झाले. या हिंसेमुळे अनेक हिंदूंना रुग्णालयात दाखल करावे लागले.
रात्री उशिरा मौलवी बाजार येथे हिंदू समुदायाने मशाल रॅली काढली. जय सिया राम आणि हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. रॅलीत हजारो हिंदू सहभागी झाले होते. या आंदोलनात हिंदूंनी चिन्मय प्रभूंच्या अटकेचा तीव्र निषेध केला आणि त्यांच्या सुटकेसाठी मागणी केली.
कट्टरपंथीयांनी सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान बांग्लादेशातील प्रशासन आणि पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट प्रशासन मूकदर्शक बनून राहिल्याचा आरोप हिंदू समुदायाने केला आहे. शाहबाग येथे झालेल्या हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले असून त्यातील दृश्ये हल्ल्याची भयानकता स्पष्ट करतात.
चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि त्यानंतरच्या हल्ल्यांवर हिंदू समाजासोबतच भारतीय राजकीय नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी ट्विट करत बांग्लादेशातील हिंदूंच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती केली की, या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून बांग्लादेश सरकारवर दबाव आणावा.
चिन्मय कृष्ण दास हे हिंदू समाजाच्या न्यायासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्यांच्या अटकेमुळे बांग्लादेशातील हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कट्टरपंथीय हल्ल्यांमुळे हा संघर्ष अधिकच उग्र स्वरूप घेतोय.
सध्या बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंदू समाजाला आपले हक्क मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्याची गरज भासू लागली आहे. चिन्मय प्रभूंच्या सुटकेसाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे.




















