विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बीड जिल्हयातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडें यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे. यावर मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुंडे म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता. आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती.
दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे. माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही, असे मला वाटते. जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.
दरम्यान बीड विधानसभेचे आमदार आणि एकेकाळचे धनंजय मुंडे सहकारी संदीप क्षीरसागर यांनी दावा केला की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. संदीप क्षीरसागर यांनी याबद्दल एक्सवर पोस्ट टाकली. त्यात ते म्हणाले, “वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे, तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे खास आहेत. त्यामुळे राजीनामा अशक्य आहे. अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा अशक्य आहे”.
Dhananjay Munde said ready to resign but…
महत्वाच्या बातम्या