Bilawal Bhutto ‘पाणी नाही मिळालं तर कुठे उडी मारणार?’ हरदीप पुरी यांचे बिलावल भुट्टोंना जोरदार प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाणीच मिळाले नाही तर उडी मारणार कोठे असा सवाल करत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांच्या ‘रक्त सांडेल’ या धमकीच्या विधानावर जोरदार टीका केली.

सिंध प्रांतातील सुक्कर येथे एका सभेत बोलताना बिलावल भुट्टो यांनी, “सिंधू नदी आमची आहे आणि ती आमचीच राहील. जर या नदीतून पाणी वाहिलं नाही तर भारताचं रक्त वाहिल,” असा इशारा दिला होता. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध तोडून सिंधू जलकरार निलंबित केल्यावर भुट्टोंनी ही धमकी दिली होती. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.



या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हरदीप पुरी म्हणाले, “तो म्हणतो की जर पाणी मिळालं नाही तर रक्त वाहिल. मग त्याला सांगा की आधी स्वतःचं रक्त कुठे सांडतोय ते बघावं. पण जर पाणीच नसेल, तर उडी कुठे मारणार? हे पूर्णपणे मूर्खपणाचं वक्तव्य आहे.”

पुरी म्हणाले, “पहलगाममध्ये घडलेली घटना ही राज्य पुरस्कृत दहशतवाद आहे. ही वैयक्तिक कृती नव्हती. ही शेजारील राष्ट्राकडून पाठिंबा दिलेली कारवाई आहे. त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनीही मागील २० वर्षांपासून अशा कारवाया केल्याचे कबूल केले आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितले आहे की पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल. पहलगाम हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे याबाबत कोणतीही शंका नाही. हे सीमापारचे अतिरेकी असून पाकिस्तानने त्यांना भारतावर सोडले आहे,” असेही पुरी म्हणाले.

‘If you don’t get water, where will you jump?’ Hardeep Puri’s strong response to Bilawal Bhutto

महत्वाच्या बातम्या