विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला जागतिक डिजिटल नकाशावर एक नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी अंडमान-निकोबार बेटांना जागतिक इंटरनेट डेटा ट्रान्स्फर हब बनवण्याचा भव्य प्रस्ताव सादर केला. Andaman Islands
‘गूगल भारत एआय शक्ती २०२५’ या कार्यक्रमात बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, अंदमान बेटांचा भौगोलिक पल्ला भारतासाठी अत्यंत रणनीतिक आहे. “सिंगापूरवरील इंटरनेट डेटा हबचा ताण वाढत चालला आहे. मग आपण अंदमानला पुढील मोठा ‘ग्लोबल इंटरनेट हब’ का बनवू नये?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या योजनेसाठी भारत सरकारकडून संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या घोषणेदरम्यानच गूगलने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे पाच वर्षांत (२०२६–२०३०) १५ अब्ज डॉलर गुंतवणूक करून अमेरिकेबाहेरील सर्वात मोठे एआय डेटा सेंटर उभारण्याची घोषणा केली. हा भारतातील गूगलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गुंतवणुकीचा उपक्रम मानला जात आहे.
या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गूगल क्लाउडचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस कुरियन उपस्थित होते. वैष्णव यांनी सांगितले की, अंडमान बेटे दक्षिण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातील देशांना अधिक वेगवान आणि विश्वसनीय इंटरनेट जोडणी देऊ शकतील.
वैष्णव यांच्या दृष्टीकोनात फक्त किनारी विकास नव्हे तर ईशान्य भारताच्या डिजिटल जोडणीचाही समावेश आहे. त्यांनी विशाखापट्टणम ते म्यानमारच्या सिटवे मार्गे मिझोरमपर्यंत सबमरीन केबल लिंक उभारण्याचा प्रस्ताव मांडला. ही लिंक रेलटेलच्या नेटवर्कशी जोडली जाणार असून मिझोरमपर्यंत रेल्वे विस्तार प्रकल्प आधीच सैरंगपर्यंत पोहोचला आहे. या माध्यमातून ईशान्य राज्यांना हाय-स्पीड इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
आदानी कॉनेक्स आणि एअरटेल यांच्या सहकार्याने उभारला जाणारा विशाखापट्टणम एआय हब हा एक गिगावॉट क्षमतेचा डेटा सेंटर कॅम्पस असेल, ज्यात एआय इन्फ्रास्ट्रक्चर, फायबर नेटवर्क, ट्रान्समिशन लाईन, स्वच्छ ऊर्जा प्रकल्प आणि ऊर्जा साठवण प्रणाली उभारण्यात येतील.
या हबमधून गूगलचे सर्च, यूट्यूब, वर्कस्पेस यांसारख्या सेवा चालवल्या जाणार आहेत. तसेच MakeMyTrip, Meesho, TCS, CoRover, Glance, Invideo AI, Sarvam यांसारख्या भारतीय कंपन्या व स्टार्टअप्सना थेट आधार मिळणार आहे.
वैष्णव म्हणाले, “अंडमान बेटांमधील ही डिजिटल संरचना भारताच्या एआय युगासाठी एक गेम-चेंजर ठरेल. यामुळे उच्च मूल्याची रोजगारनिर्मिती आणि आर्थिक संधी निर्माण होतील.”
त्यांनी गूगलला भारतीय आयटी व्यावसायिकांना रिस्किलिंग करण्याचे आवाहन केले आणि टेंसर प्रोसेसिंग युनिट्स (TPUs) भारतात आणून Nvidia च्या GPUs सोबत स्पर्धा करण्याचे सुचवले.
मुख्यमंत्री नायडू यांनी या गुंतवणुकीला भारताच्या डिजिटल परिवर्तनातील नव्या पर्वाची सुरुवात म्हटले. “विशाखापट्टणम आता भारताच्या एआय नवउद्योजकतेचे केंद्र ठरणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पाचा नवीकरणीय ऊर्जेवर भर असल्याने गूगलच्या २०३० पर्यंत नेट झिरो कार्बन उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ दृष्टिकोनाशी सुसंगत असून भारताला एआय सुपरपॉवर बनवण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे.
New wings for India’s digital capabilities, Andaman Islands to be made ‘Global Internet Hub’
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा