विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कृषी महाविद्यालयांमध्ये सुरक्षा तपासणी; चौकशी समिती नियुक्त

विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात विजेचा धक्का लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलत सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. Agricultural College

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातील अॅग्रीकल्चरल बिझनेस मॅनेजमेंटचा विद्यार्थी चैतन्य चव्हाण याला १४ मार्च रोजी खानावळीत पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरजवळ विजेचा धक्का बसला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी तातडीची बैठक घेऊन चौकशी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.



तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व संलग्न कृषी महाविद्यालयांमध्ये अग्निशामक आणि स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीमध्ये विद्यापीठाच्या अभियंत्यांचाही समावेश असणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी २०२३ पासून विजेचे धक्के बसत असल्याची तक्रार केली होती, असा दावा केला असला तरी याबाबत कोणतीही लेखी तक्रार मिळालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

Safety Audit Ordered in Agricultural Colleges After Student Death; Inquiry Committee Appointed

महत्वाच्या बातम्या