विशेष प्रतिनिधी
पुणे : “काँग्रेस पक्ष जितका तुम्ही खाली आणाल, तितका तुमचा राजकीय फायदा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ,” असा संदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, “काँग्रेसमधील लोक आपल्या संपर्कात येत असतील, तर त्यांना रोखू नका. त्यांचे स्वागत करा. काँग्रेसमधून किती लोक आपल्याकडे येतात यावर तुमचा पुढचा राजकीय प्रवास ठरेल. तुमच्या भागात काँग्रेसचे कोण कार्यकर्ते नाराज आहेत, कोणी पक्ष बदलू इच्छित आहे, याची माहिती मिळवा आणि त्यांना आपल्या पक्षात सामील करा. काँग्रेसमधून लोक येणे ही तुमच्यासाठी संधी आहे. नवीन कोणी आले म्हणून तुमची संधी जाणार नाही.
बावनकुळे म्हणाले, काँग्रेसमध्ये काही उरलेलं नाही. शरद पवारांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोलमडला आहे. त्यांना स्वतःची पार्टी सांभाळता येत नाही. शिवसेना (ठाकरे गट) चे लोक आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केल्याने अनेकांनी आमच्यात यायचा निर्णय घेतला. काँग्रेसला दिशा नाही, धोरण नाही. जो कोणी येईल, त्याचे स्वागत आहे. इतके जण येत आहेत की तुम्ही थकून जाल.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवताना बावनकुळे म्हणाले, “लोक आता त्यांना सिरीयसली घेत नाहीत. ते स्वतः लिहितात, छापतात आणि वाचतात.