विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद: भारताने पाकिस्तानविरुध्द हल्ले सुरू केल्यावर बलुचिस्तानातील बंडखाेरांनी उचल खाल्ली हाेती. पाकिस्तानी लष्करावर हल्ले सुरू केले हाेते. याच बलूच लिबरेशन आर्मी (Baloch Liberation Army) ने भारताकडे साकडे घातले आहे. बीएलएने एक पत्र जारी करून म्हटले आहे की भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा. आम्ही पश्चिमेकडून त्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तयार आहोत.
बीएलएने पाकिस्तानच्या शांतता आणि युद्धविरामच्या वक्तव्यांना खोटा प्रचार आणि धोका असल्याचे म्हटले आहे. हा केवळ पाकिस्तानचा एक डाव आहे. आम्ही भारत आणि प्रादेशिक शक्तींना आवाहन करतो की पाकिस्तानच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि निर्णायक पाऊल उचला. पाकिस्तानला ‘दहशतवादाची फॅक्टरी’ असे संबोधून बीएलएने म्हटले आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने सांगितले की, कोणत्याही बाह्य समर्थनाशिवाय आम्ही पाकिस्तानसारख्या अणुबॉम्बधारी देशाला बलुचिस्तानच्या भूमीवर अनेक मोर्चेंवर पराभूत केले आहे. भारताने आम्हाला राजकीय, राजनैतिक आणि लष्करी सहकार्य करावे जेणेकरून पाकिस्तानला मुळापासून उखडून टाकता येईल. जोपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात आहे. तोपर्यंत या प्रदेशात दहशतवाद आणि अस्थिरता कायम राहील, असा इशारा बीएलएने दिला आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे की जर भारताने पाकिस्तानला संपवण्याचा निर्णय घेतला तर बीएलए पश्चिमी आघाडीवरून लष्करी सहकार्य देण्यासाठी तयार आहे. आम्ही त्याला पूर्णपणे नष्ट करू. जर जगाने या संधीला ओळखले नाही तर बलोच जनता आपल्या बळावर हा संघर्ष सुरू ठेवेल, असेही बीएलएने म्हटले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता, संतुलन आणि दहशतवादाचा शेवट करू शकते, असा दावा बीएलएने केला आहे.