Manoj Naravane : युद्ध आणि हिंसा शेवटचा उपाय, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे मत

विशेष प्रतिनिधी

पुणे : युद्धामुळे मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विस्थापन असे अदृश्य, पण खोल सामाजिक नुकसान होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे.” असे मत देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) यांनी मांडले आहे.

पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मनोज नरवणे म्हणाले की, “काही लोक विचारत आहेत की, आपण पूर्ण युद्ध का केले नाही? आदेश मिळाला तर मीदेखील युद्धात जाईन, पण युद्ध माझी पहिली पसंती नसेल. माझी पहिली पसंती मुत्सद्देगिरीला आहे. युद्ध ही काही रोमँटिक गोष्ट नाही. ना ती एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमासारखी आहे.

नरवणे म्हणाले की, “ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांच्यासाठी ते कायमचे दुःख ठरते. ज्यांनी भयानक दृश्ये पाहिली, आहेत त्यांना 20 वर्षांनंतरही घाम फुटतो आणि मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता भासते. युद्ध हे रोमँटिक बॉलिवूड सिनेमासारखे नाही. तो एक गंभीर मुद्दा आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय ठेवला पाहिजे. आपले पंतप्रधान म्हणाले होते की, हे युद्धाचे युग नाही.

मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील, पण आपण त्याचे स्वागत करू नये.” असे म्हणत त्यांनी महत्त्वाचा संदेश दिला. संवादाद्वारे मतभेद सोडवणे आणि सशस्त्र संघर्षाच्या टप्प्यावर न पोहोचणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी. राष्ट्रीय सुरक्षेत आपण सर्व समान भागीदार आहोत. आपण केवळ देशांमधीलच नव्हे तर आपल्यातील मतभेदही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग ते कुटुंबांमध्ये असोत किंवा राज्ये, प्रदेश आणि समुदायांमध्ये असोत. हिंसाचार हा उपाय नाही,” असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. पण अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुन्हा एकदा घात केला. पण, पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्याचा भारतीय सैन्याने प्रतिकार केला. पण, भारताने पाकिस्तानसोबत केलेल्या शस्त्रसंधीनंतर ती करण्याची गरज नव्हती, अशी मते देशभरातून आली. काहींनी भारताच्या या निर्णयाला सहमती दर्शवली तर काहींनी विरोध करत पाकिस्तानसोबत युद्ध करण्याचा सल्ला दिला. माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे मत यामुळे महत्वाचे मानले जात आहे.

War and violence are the last resort, says former Army Chief General Manoj Naravane

महत्वाच्या बातम्या