Uday Samant : उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यात चौथ्यांदा संवाद; युतीच्या चर्चांना उधाण!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले असतानाच, मंगळवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.

विशेष म्हणजे ही गेल्या काही दिवसांतील सामंत आणि राज यांची चौथी भेट असून, या भेटीने मनसे-शिंदेसेना युतीच्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे. मात्र, ही भेट अराजकीय असल्याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला आहे.

सामंत यांनी स्पष्ट केलं, “मी सकाळी या भागात काही कामानिमित्त आलो होतो. तेव्हा स्वतः राजसाहेबांना फोन करून भेटीची विनंती केली. भेटीत चहा घेतला, खिचडी खाल्ली, गप्पा मारल्या. मुंबईच्या विकासाबाबत नेहमीप्रमाणे चर्चा झाली. महापालिका निवडणुकीसंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. ती झाली असती, तर लपवून ठेवण्यासारखं काही नव्हतं.”

सामंत म्हणाले, “राजकारणाच्या पलीकडेही काही संबंध असतात. एखाद्या भेटीला लगेच युतीचे लेबल लावणे योग्य नाही.मी आता राज ठाकरेंच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला चाललो आहे, म्हणजे आता बातम्या लावा की युती ठरली! पण असं काही नाही.”

उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल करताना सामंत म्हणाले, “उबाठाचे अनेक नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवासेनेचे पदाधिकारी पक्ष सोडत आहेत. त्यावर उबाठाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर लोक विश्वास ठेवत आहेत. त्यांचं काम लोकांना प्रभावित करतंय.

कधी कधी सगळ्या चर्चा सांगता येत नाहीत. जेव्हा खरंच काही राजकीय ठरेल, तेव्हा मी आणि संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेऊनच सांगू, असे सूचक विधानही सामंत यांनी केले.

Fourth dialogue between Uday Samant and Raj Thackeray; Alliance talks fueled

महत्वाच्या बातम्या