Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रावर हिंदी थोपवण्याच्या विरोधात काँग्रेसचा लढा चालूच राहणार, हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे. मराठीच्या अस्मितेसाठी हिंदी विरोधातील लढा सुरूच राहील असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी दिला आहे.



सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, दुर्दैवाने आज महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर चालणाऱ्या राज्य सरकारने सुरू केला आहे. मातृभाषेचा अवमान आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर होणारी भाषिक सक्ती ही केवळ अपमानास्पद नाही, तर ही सांस्कृतिक गुलामगिरीकडे घेऊन जाणारी हिंदी – हिंदू- हिंदू राष्ट्र या उद्देशाने सुरु आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांसह काँग्रेसने या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठीचा अभिमान, तिचं संवर्धन आणि तिच्या प्रतिष्ठेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर तो दीर्घकालीन, वैचारिक आणि लोकशाही मूल्यांचा लढा आहे.

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असले, तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली नवीन समिती ही सरकारच्या पुन्हा एकदा हिंदी लादण्याच्या संभाव्य कटाचा स्पष्ट संकेत आहे. शासन निर्णय मागे घेण्यात आले, हा लढ्यातील पहिला विजय आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी झटणाऱ्या अभ्यासक, सामाजिक संघटना, आणि सर्व मराठीप्रेमी नागरिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन. परंतु, ही लढाई अजून संपलेली नाही, असे सपकाळ म्हणाले.

मराठी ही आपली अभिव्यक्ती आहे, आमची संस्कृती आहे, आणि आमचा आत्मसन्मान आहे. या भूमीचा प्रत्येक कण, प्रेरणा देणारा आहे, प्रत्येक चळवळ ही मराठी भाषेतूनच घडलेली आहे. त्यामुळे मराठीवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाविरोधात काँग्रेसचा लढा अखंड आणि अविरत राहील. भविष्यातही मराठी भाषेच्या सन्मानासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील. मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Congress’ fight against imposition of Hindi on Maharashtra will continue, asserts Harshwardhan Sapkal

महत्वाच्या बातम्या