Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातून सात महत्वाच्या स्थळांचा युनेस्कोच्या यादीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या सातपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले – ज्यातील ११ महाराष्ट्रात आणि एक जिंजी (तामिळनाडूत) असलेले जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रस्ताव सादर केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस ( Devendra Fadnavis) म्हणाले, “हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद यश आहे. जगभरातील शिवभक्तांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

ही यादी पुढीलप्रमाणे आहे:
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,शिवनेरी,लोहगड,साल्हेर, सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी (तामिळनाडू)

या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम घाट, घनदाट जंगलं आणि किनारपट्टी अशा विविध भौगोलिक रचनांमध्ये त्यांची बांधणी करण्यात आलेली आहे. संरक्षणासाठी केलेले दरवाजांचे अदृश्य डिझाइन, उंच डोंगरावरील स्थान, तसेच दूरदृष्टीने आखलेली युद्धनीती यामुळे युनेस्कोच्या शिष्टमंडळानेही याला विशेष महत्त्व दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, युनेस्कोकडून आलेल्या पथकाने या किल्ल्यांना भेट दिली. त्यानंतर भारत सरकारचे प्रतिनिधी मंडळ आशिष शेलार यांच्या नेतृत्वात युनेस्कोच्या मुख्यालयात पोहोचले. तिथे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले.

या निर्णयासाठी २० देश सदस्य राष्ट्रे आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, परराष्ट्र मंत्री, तसेच भारताचे प्रतिनिधी श्री. शर्मा आणि अप्पर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी या देशांशी थेट संवाद साधला आणि भारताच्या बाजूने वातावरण तयार केले.

या २०ही देशांनी भारताच्या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला आणि शिवरायांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, “या किल्ल्यांचे जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळणार असून युनेस्कोच्या संकेतस्थळावर त्यांची माहिती प्रदर्शित केली जाईल. हे महाराष्ट्राच्या वैभवाचे आणि शिवचरित्राच्या जागतिक गौरवाचे प्रतीक ठरेल.”

12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj included in World Heritage List; Chief Minister Devendra Fadnavis thanks Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या