India Front MPs march : इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगावर मतदार चोरीचा आरोप करत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोठा मोर्चा काढला. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत पायी मोर्चा काढणाऱ्या खासदारांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि धक्काबुकी झाली. राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, मल्लिकार्जुन खर्गे, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या मोर्च्यात सहभाग घेतला.



राहुल गांधी यांच्या नेतृत्वात तब्बल 300 खासदारांनी संसदेतून निवडणूक आयोगावर मोर्चा सुरु केला. यावेळी दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नसल्याने हा मोर्चा अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर घेतले असून सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी सुरु केली. बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावरून या खासदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी खासदार प्रियंका गांधी यांनी, हे सरकार भित्रे असल्याची टीका केली. तसेच, ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय लढाई नाही तर संविधानाची लढाई आहे. संविधानाला वाचविण्याची लढाई आहे, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. आम्हाला एक क्लीन आणि संपूर्ण मतदार यादी आम्हाला हवी असल्याची मागणी राहुल गांधींनी यावेळी केली आहे.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी याच्यासह अनके खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मार्च करणाऱ्या अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तरी मार्च थांबला आहे. या नेत्यांना दिल्ली पोलिस बसमध्ये घेऊन जात आहेत. त्यांना मध्य दिल्लीबाहेर सोडत आहेत. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की विरोधी नेत्यांना निवडणूक आयोगाने वेळ दिला होता, पण ते त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत तर रस्त्यावर गोंधळ घालत आहेत. या खासदारांना दोन बसमध्ये घेऊन गेले आहे. राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना घेऊन गेले आहे. विरोधी खासदारांचे म्हणणे आहे की ते निवडणूक कार्यालयात जात होते, पण त्याआधीच त्यांना थांबवण्यात आले. यानंतर त्यांना बसमध्ये नेण्यात आले. त्यांना सध्या संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

India Front MPs march against Election Commission

महत्वाच्या बातम्या