Vijay Vadettiwar : भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांकडून मला टार्गेट, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

नागपूर : विरोधक ओबीसींच्या बाजूने ताकदीने उभे होत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने काही नेत्यांना पुढे करत हा विषय हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला टार्गेट केले आहे, असा आराेप काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.



बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली हाेती. यावर वडेट्टीवार म्हणाले, बीडच्या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मला का टार्गेट केले? मी तर कधीच त्यांचा शत्रू नव्हतो. त्यांचा विरोध केला नाही, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. मला निमंत्रण नव्हते, माझ्या मतदारसंघात काम होते म्हणून मी मोर्चाला जाऊ शकलो नाही .
वडेट्टीवार म्हणाले की,कालच्या बीडच्या मेळावा झाला यामध्ये सत्ताधारीच पक्ष पूर्णपणे दिसून आला. सत्ताधारी पक्षाने मोर्चे काढत ओबीसी समाजाचे वाटोळं झाले म्हणायचे आणि सरकारमध्ये भूमिका मांडायची नाही. विरोधक ओबीसींच्या बाजूने ताकदीने उभे होत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने काही नेत्यांना पुढे करत हा विषय हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.सर्वांनी एकत्र येत काम केले पाहिजे.भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला टार्गेट केले आहे. नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी आली तिथून अपेक्षा नव्हती तेवढा ओबीसी समाज रस्त्यावर उतरला. त्याला सरकार घाबरले आणि छगन भुजबळ यांना पुढे करत मला टार्गेट करण्याचे काम सुरू केले. मला टार्गेट करत जर ओबीसी समाजाचे भलं होणार असेल तर काही हरकत नाही. पण जी आर रद्द करावा. मी भुजबळांच्या पाया पडायला जाईल.
वडेट्टीवार म्हणाले की,अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा झाली. मराठा-ओबीसी लढाईमध्ये कोयता-तलवारीची भाषा केल्याने आपल्याला जे हवे ते मिळेल का? आपल्याला जे हवे ते संवैधानिक मार्गाने मिळवायचे आहे.आंदोलन, मोर्चा काढत सरकारवर प्रेशर टाका आणि जे हवे ते मिळवा पण कोयत्याची भाषा केल्यावर मी दुसऱ्या सभेला कसा जाणार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंढरपूरच्या मेळाव्यासाठी मला निमंत्रण देण्यात आले नाही. कुणीही मला फोन केला नाही. कालच्या बीडच्या मेळावा झाला यामध्ये सत्ताधारीच पक्ष पूर्णपणे दिसून आला. सत्ताधारी पक्षाने मोर्चे काढत ओबीसी समाजाचे वाटोळं झाले म्हणायचे आणि सरकारमध्ये भूमिका मांडायची नाही. जरांगे पुराण आता खूप झाले, पण ज्या सरकारने तो जी आर काढला आमचे वाटोळं करण्यासाठी त्या सरकारच्या नावाने सुद्धा टीका केली पाहिजे. ही माझी कालही भूमिका होती आजही आहे. मोठा समाज नोकरी, शिक्षणातील संपूर्ण आरक्षण खाऊन टाकेल मग गरीब 375 जातींना काहीही उरणार नाही . महायुती सरकारकडून जाती-जातींमध्ये वाद लावण्याचे काम सुरू आहे. मराठा-ओबीसी, धनगर-आदिवासी आणि दलितांमध्ये वाद लावण्याचे काम सुरू आहे. हे राज्य अस्थिर करत मुलभूत प्रश्नावर जनतेचे लक्ष केंद्रित होऊ नये. रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवर जनतेने बोलू नये यासाठी महायुती सरकारने हे वाद सुरू केले आहे.

Vijay Vadettiwar alleges that Bhujbal targeted me on BJP’s behest

महत्वाच्या बातम्या