विशेष प्रतिनिधी
पाटणा: बिहारमध्ये निवडणुकीचा ताप चढला असताना, काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र मैदानाबाहेर दिसत आहेत. एनडीएचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नीतीश कुमार रोज सभांमधून जनतेशी संवाद साधत असताना, महागठबंधनचा चेहरा असलेले राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून बिहारमध्ये दिसलेलेच नाहीत.
राहुल यांचा शेवटचा दौरा १ सप्टेंबर रोजी झाला होता, जेव्हा त्यांनी “वोटर अधिकार यात्रा” संपवली. त्यानंतर ना सभा, ना रॅली, ना आभासी उपस्थिती. दरम्यान, बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान ६ नोव्हेंबरला होणार असून प्रचाराचा शेवट ४ नोव्हेंबरला होईल. मात्र, राहुल गांधींची अनुपस्थिती काँग्रेसमध्येच चिंतेचा विषय ठरत आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “राहुलजींनी यात्रेतून पक्षाला ऊर्जा दिली होती, पण आता त्यांचा अभाव आमच्यासाठी तोट्याचा ठरत आहे.” राहुल गांधी दिल्लीतील कार्यक्रमांत ‘इमरती बनवताना’ दिसले, पण बिहारच्या मैदानात नाहीत, अशी खिल्लीसुद्धा उडवली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसमहासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले की, “राहुल गांधी छठपूजनंतर बिहारमध्ये येणार आहेत. २९ ऑक्टोबरला ते तेजस्वी यादव यांच्यासह संयुक्त सभा घेतील, तर प्रियंका गांधी २८ ऑक्टोबरला येणार आहेत.
‘वोटर अधिकार यात्रा’ दरम्यान राहुल गांधींनी ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु १ सप्टेंबरला पटण्यात यात्रेचा समारोप फारसा प्रभावी ठरला नाही. त्यानंतर राहुल परत दिल्लीला गेले आणि बिहारमध्ये प्रचार थंडावला.
या पार्श्वभूमीवर, राहुल गांधींचे पोस्टर अनेक जिल्ह्यांमधून गायब झाल्याचेही दिसत आहे. “यात्रेमुळे पक्षात उत्साह निर्माण झाला होता, पण आता तो ओसरला आहे,” असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, महागठबंधनने २३ ऑक्टोबर रोजी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केले, पण त्यानंतर काँग्रेसची गती मंदावली. कार्यकर्त्यांच्या मते, “यात्रा झाली, पण राहुलजींना निवडणुकीची आठवण राहिली का?” असा प्रश्न आता मतदार विचारताना दिसत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राहुल गांधींचा हा “गायब प्रचार” काँग्रेससाठी महागात पडू शकतो. बिहारमध्ये मोदी आणि तेजस्वी मैदानात असताना, राहुल गांधी मात्र दिल्लीच्या छायेत अदृश्य झाले आहेत आणि या निवडणुकीचा परिणाम त्याचं उत्तर ठरणार आहे.
Rahul Gandhi missing in Bihar elections
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















