राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महापालिका – जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की फक्त नगरपरिषदांचा बार उडणार!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज , मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होत असून महापालिका – जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होणार की फक्त नगरपरिषदांचा बार उडणार याबाबत उत्सुकता आहे. State Election Commission

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली अनिश्चितता अखेर संपण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (मंगळवार, ४ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यात महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आणि प्रशासकीय तयारीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या पत्रकार परिषदेत केवळ निवडणुकीच्या तारखांची घोषणा नव्हे, तर आरक्षणासंदर्भातील अंतिम स्थिती, मतदार याद्यांचे पुनरावलोकन, आणि प्रशासकीय टप्प्यांतील प्रगती यासंबंधीही महत्वाची माहिती देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.



राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा तिढा, वॉर्डरचनेतील बदल, आणि प्रशासकीय अडचणी यांमुळे रखडल्या होत्या. या संस्थांमध्ये सध्या प्रशासक राजवट लागू असून, नागरिकांचे प्रश्न लोकप्रतिनिधीविना सोडवले जात आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष आणि विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, सोलापूर, औरंगाबाद यांसारख्या १५ हून अधिक महापालिका, तसेच २५ जिल्हा परिषद आणि २४८ पंचायत समित्यांच्या निवडणुका विविध कारणांमुळे अनेक महिन्यांपासून रखडल्या आहेत. या विलंबामुळे स्थानिक स्तरावरील विकासकामे आणि निधीवाटप प्रक्रियाही ठप्प झाली आहे.

निवडणुकीसाठीची मतदार यादी, मतदान केंद्रांची आखणी, ईव्हीएम तपासणी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या प्रक्रियांचा बहुतांश भाग पूर्ण झाला आहे. फक्त अंतिम अधिसूचना आणि तारखांची घोषणा बाकी आहे.
आजच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरातील निवडणुकीचा औपचारिक बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

State Election Commission to Hold Press Conference Today

महत्वाच्या बातम्या