विशेष प्रतिनिधी
पुणे : आता मागे हटायच नाही, लढायचं असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी उमेदवारांना दिला आहे. ईव्हीएम विरोधात मविआ एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आली आहे.
शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत. २८ तारखे पर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशी ही सूचना देण्यात आली आहे. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची माहिती शरद पवारांनी उमेदवारांना दिली.
दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही, पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती. ईव्हीएममधील घोळासंदर्भात सर्वांनी आपले म्हणणं मांडले. मतदानात तफावत आहे. ५ टक्के व्हीव्ही पॅटची तपासणी होण्यासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. माझ्या मतदारसंघात 10 उर्दू शिक्षिकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होते, अशी माहिती ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी दिली.