Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे टोचले कान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे कान टोचले. मंत्रालयात काम घेऊन आलेल्या लोकांच्या गर्दीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्‍यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या.

राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात. त्यांना कसलाही आणि कोणाकडूनही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांनी दिलेल्या सूचनांवर पुढे काय झाले याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका, खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत असे आदेश त्यांनी दिले.

Devendra Fadnavis gave strict orders to government officials

महत्वाच्या बातम्या