आघाडी झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर , दिलीप वळसे पाटील यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

शिर्डी : येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढणार असल्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, आजपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल. पण, जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढायला तयार आहे.”



पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे. राजकीय पक्ष सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना काही ना काही दिशा, धोरण याची सूचना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड वर्षांपूर्वी अनेक घडामोडी झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश मिळालं नाही. पण त्यानंतर विधानसभेला चांगलं यश मिळाले. विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती अशा विविध संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मुंबई, दिल्लीशिवाय गाव, जिल्हा नियोजनासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या निवडणुकांसाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. उद्याची दिशा काय राहील यावर दोन दिवस चर्चा होईल .लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुका असतात. तिथे युती करुन लढणं आवश्यक असतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर विशेष करुन जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इथे कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा असते. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्यामुळे तडजोड करावी लागते. त्यामुळे जिथे शक्य असेल, तिथे महायुती म्हणून लढू. पण समजा एखाद्या ठिकाणी नाही लढलो, तर निवडणूक झाल्यानंतर जिथे महायुती बनवू शकतो, तिथे प्रयत्न करु.

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीवर बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. त्याचबरोबर दोषींना शिक्षाही झाली पाहिजे.

Dilip Valse Patil clarified that if there is a front, then on our own

महत्वाच्या बातम्या