विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण केलेले एअर इंडिया चे विमान (AI-171) आज दुपारी साडेएकच्या सुमारास टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत मेघाणी नगर भागात कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
AI-171 ही फ्लाइट बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर प्रकारातील असून, आज दुपारी 1:38 वाजता टेकऑफ करताच काही क्षणांत नियंत्रण सुटल्याने मेघाणी नगर भागात एका झोपडपट्टीजवळ कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान हवेत लवकरच लहरत होते आणि अचानक मोठा आवाज करत खाली आले. अपघातानंतर विमानाचे काही भाग घरांवर आदळल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
अपघात घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. NDRF चे तीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून, वडोदऱ्यातून आणखी तीन पथकं मागवण्यात आली आहेत. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची अधिकृत संख्या व नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. स्थानिक लोक व स्वयंसेवी संस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून, “हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. तपासासाठी DGCA आणि AAIB ला तात्काळ निर्देश दिले आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल स्वतः घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत बचाव यंत्रणांना अधिक मदतीचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
DGCA व AAIB कडून तपास सुरू करण्यात आला असून, फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) शोधण्याचे काम सुरू आहे. प्रारंभिक अंदाजानुसार, यांत्रिक बिघाड, टेकऑफवेळी इंजिन फेल होणे किंवा हवेतील पक्ष्यांशी (bird hit) टक्कर अशी कारणे असू शकतात. प्रत्यक्ष कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.
एअर इंडियाने प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हॉटलाइन क्रमांक जारी केला आहे.
हॉटलाइन: 1800-180-1407
तसेच, अपघाताबाबत ज्या प्रवाशांची नावं मिळालेली आहेत त्यांची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
Air India plane crashes near Ahmedabad, 242 passengers in danger
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला
- Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
- Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसा
- Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, नारायण राणे यांची चिरंजीव नितेश राणे यांना समज