विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत ८ अवैध बांगलादेशी घुसखोरांना सीमारेषेवरून परत पाठवले. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या कारवाईबाबत सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी या घुसखोरांना ‘जगातील आठवे आश्चर्य’ असे संबोधत म्हटले की, “हे ‘आश्चर्य’ आता आसाममध्ये फिरायला स्वागतार्ह नाहीत.” सरमा यांनी विनोदी शैलीत पोस्ट करत लिहिले – “८ अॅलिस इन वंडरलँड पाठवले गेले, बाय!”
ही कारवाई २० ऑक्टोबर रोजी झालेल्या आणखी १८ बांगलादेशी नागरिकांच्या देशाबाहेर पाठविण्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी करण्यात आली. त्यावेळी सरमा यांनी क्रिकेटची उदाहरण देत ती कारवाई “विराट कोहलीच्या स्ट्रेट ड्राइव्हसारखी अचूक होती” असे ट्विट केले होते.
गेल्या काही महिन्यांपासून आसाम पोलिसांनी सीमारेषेवरून अवैध घुसखोरांना तात्काळ ओळखून परत पाठवण्याच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. राज्य सरकारने अलीकडेच ‘इमिग्रंट्स (एक्स्पल्शन फ्रॉम आसाम) ॲक्ट, १९५०’ हा विस्मृतीत गेलेला कायदा पुन्हा अमलात आणला आहे. या कायद्यानुसार, जे व्यक्ती १० दिवसांच्या आत भारतीय नागरिकत्वाचे पुरावे दाखवू शकत नाहीत, त्यांना कोणत्याही फॉरेनर्स ट्रिब्युनलकडे न पाठवता थेट हद्दपार करता येते.
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते की हा १९५० चा कायदा अद्याप आसाम राज्यात वैध आहे. त्यानंतर राज्य सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती (SOP) जारी केली. या SOP नुसार, सीमारेषा ओलांडताना पकडले गेलेले अवैध स्थलांतरित १२ तासांच्या आत परत पाठवता येतात, त्यासाठी कोणत्याही दीर्घ कायदेशीर प्रक्रियेची आवश्यकता नाही.
राज्य सरकारने आदेश दिले आहेत की सर्व संशयित घुसखोरांची बायोमेट्रिक आणि जनसांख्यिकीय माहिती ‘फॉरेनर्स आयडेंटिफिकेशन पोर्टल’वर नोंदवली जावी. यामुळे त्यांचे पुन्हा भारतात शिरकाव होणे कठीण होईल.
ऑक्टोबर २०२४ मध्ये संविधान पीठाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्य सरकारला १९५० च्या कायद्याअंतर्गत थेट प्रशासकीय कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे आधी जसे प्रत्येक प्रकरण ‘फॉरेनर्स ट्रिब्युनल’मार्फत वर्षानुवर्षे लांबत होते, तसा त्रास टाळता येणार आहे.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “हा कायदा विसरला गेला होता, पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्याला न्यायिक मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारीसुद्धा आता थेट घुसखोरांना परत पाठविण्याचे आदेश देऊ शकतात.”
या निर्णयामुळे आसाम सरकारला अवैध स्थलांतरितांविरोधात अधिक प्रभावी पाऊले उचलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमाभागात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा २४ तास गस्त घालत आहेत.
Chief Minister Himanta Biswa Sarma said, ‘This eighth wonder, now not welcome in Assam’
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..