Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन

विशेष प्रतिनिधी

नागपूर : सध्याच्या देशावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) देशवासीयांना स्पष्ट संदेश दिला आहे. “आपले नागरी कर्तव्य बजावताना कोणतेही देशविरोधी षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाममधील निर्दयी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जे ठोस पाऊल उचलले, त्याचे अभिनंदन करतो. या कारवाईमुळे संपूर्ण देशात स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांचे केंद्र, आधार यंत्रणा आणि पाकिस्तानातील पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हे देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असल्याचे मत संघाने व्यक्त केले.

संघाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “सीमेवरील नागरी वस्त्यांवर आणि धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी सैन्याने केलेले हल्ले निषेधार्ह आहेत. अशा प्रकारच्या कारवायांनी भारताच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे.”

RSS ने देशवासीयांना आवाहन केले की, सरकार व प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, आणि कोणत्याही अफवा किंवा द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना साथ देऊ नका. “राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न फसवा,” असा स्पष्ट इशारा संघाने दिला आहे.

“या कठीण काळात प्रत्येक भारतीयाने तन, मन आणि धनाने राष्ट्राच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. भारतीय सैन्य आणि नागरी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य द्या आणि देशभक्तीचे उदाहरण प्रस्थापित करा,” असे आवाहन संघाच्या निवेदनात करण्यात आले आहे.

Don’t let anti-national conspiracies succeed! Rashtriya Swayamsevak Sangh appeals to countrymen

महत्वाच्या बातम्या