विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. कोलकात्यातील सभेत बोलताना ममतांनी (Mamata Banerjee) म्हटलं की, “पंतप्रधान मोदी जणू प्रत्येक स्त्रीचे पती असल्यासारखं बोलतात. मग ते त्यांच्या पत्नीला सिंदूर का लावत नाहीत?” अशा खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बॅनर्जी यांनी पुढे सांगितलं की, “सिंदूर हा प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाशी संबंधित आहे. मी ऑपरेशन सिंदूरवर टीका करू इच्छित नाही, पण पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकून वाईट वाटलं. ते स्वतःसारखं देशातील सर्व महिलांशी वागत आहेत, हे दुर्दैवी आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीपुरद्वार येथील रॅलीत ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानला दिलेला खडा उत्तर, आणि पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचाराविरोधात भाष्य केल्यानंतर, त्याला उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केलं.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना ममतांनी विचारलं की, “ऑपरेशन सिंदूर चालवलं, पण आता ‘ऑपरेशन बंगाल’ सुरू करणार का?” तसंच त्यांनी मोदींना थेट आव्हान दिलं की, “तुम्ही हिंमत असेल तर स्क्रिप्टविना माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करा. टेलीप्रॉम्प्टर घेऊन या, काही हरकत नाही!”
राजकीय विश्लेषकांच्या मते, ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य केवळ वैयक्तिक पातळीवर घसरलेलं नाही, तर त्यातून त्यांच्या मोदीद्वेषाचे टोकाचे रूप दिसून येते. ‘सिंदूर’ या पवित्र संकल्पनेवरून पंतप्रधानांविरुद्ध अशा प्रकारची टीका करणे हा स्त्रियांच्या सन्मानालाच तडा देणारा प्रकार असल्याचं अनेक महिला संघटनांनीही म्हटलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ९ जूनपासून “घराघरात सिंदूर” मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांना सिंदूर भेट म्हणून दिलं जाईल. तसेच, ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणारी पत्रकेही वितरित केली जातील.
७ मे रोजी पहाटे भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पीओकेतील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्यांसह १० दहशतवादी ठार करण्यात आले. हल्ला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून करण्यात आला होता.