विशेष प्रतिनिधी
भोपाळ: ऑपरेशन सिंदूरने स्पष्ट केले आहे की दहशतवाद्यांद्वारे प्रॉक्सी युद्ध छेडले जाणार नाही. आता आपण घरात घुसूनही मारू आणि जो कोणी दहशतवाद्यांना मदत करेल त्यालाही मोठी किंमत मोजावी लागेल. गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिला.
भोपाळमध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण महासंमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद्यांनी नारी शक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मालकांसाठी घातक ठरले. आपल्या सैन्याने शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे.
भारत हा संस्कृती आणि परंपरेचा देश आहे. आपल्या परंपरेत सिंदूर हे महिला शक्तीचे प्रतीक आहे. रामभक्तीने रंगवलेले हनुमानजी देखील सिंदूर घालतात. आपण शक्तीपूजेत सिंदूर अर्पण करतो. हे सिंदूर आता भारताच्या शौर्याचे प्रतीक बनले आहे. आमच्या सैन्याने शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या घरात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
पंतप्रधान म्हणाले की, लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर, हे नाव ऐकूनच मन श्रद्धेने भरून येते. त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडतात. देवी अहिल्या भारताच्या वारशाच्या महान रक्षक होत्या. जेव्हा देशाच्या संस्कृती आणि मंदिरांवर हल्ले होत होते, तेव्हा लोकमाताने त्यांचे रक्षण करण्याचे काम हाती घेतले. देशात अनेक मंदिरे आणि तीर्थस्थळे पुन्हा बांधण्यात आली.