विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत, अशी विश्वसनीय गुप्त माहिती भारताला मिळाली होती.त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ही कारवाई अत्यंत संयमित, नियोजित आणि जबाबदारीने करण्यात आली असून तिचा उद्देश केवळ दहशतवाद्यांची पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हाच होता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा बळी गेला. या अमानुष हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून, भारताने या घटनेची गंभीर दखल घेत पाकिस्तानविरोधात निर्णायक भूमिका घेतली आहे. बुधवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली.
मिस्री यांनी सांगितले की, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी केवळ निर्दोष पर्यटकांची हत्या केली नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडत त्यांना धमकी दिली की हा संदेश संपूर्ण देशात पसरवावा. या हल्ल्याचा उद्देश केवळ जिवे मारणे नव्हता, तर काश्मीरमध्ये असलेल्या शांतता, पर्यटन आणि विकास प्रक्रियेला उध्वस्त करणे हा होता. गेल्या वर्षी सव्वा दोन कोटीहून अधिक पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते, ही गोष्ट पाकिस्तानला खटकत होती.
या हल्ल्याची जबाबदारी ‘द रिसिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने स्वीकारली आहे. TRF ही संघटना संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा या गटाशी थेट संबंधित आहे. मिस्री म्हणाले की, TRF हे फक्त एक मुखवटा आहे, आणि त्यामागे लष्कर, जैश आणि इतर पाकपुरस्कृत संघटना कार्यरत आहेत. सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि तपासातून TRF व लष्कर यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. हल्लेखोरांची ओळख पटली असून, त्यांचे थेट पाकिस्तानाशी असलेले संबंधही स्पष्ट झाले आहेत.
भारताने ही घटना केवळ एक हल्ला म्हणून न पाहता, पाकिस्तानच्या नियोजित सीमा-पार दहशतवाद धोरणाचा भाग म्हणून पाहिले आहे. मिस्री यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानने आजवर फक्त नकार, आरोप-प्रत्यारोप आणि भाष्य केलं, पण दहशतवाद्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलटपक्षी, दहशतवाद्यांना संरक्षण, प्रशिक्षण व अर्थसहाय्य देऊन त्यांना भारतात पाठवण्याचं काम ते सातत्याने करत आले आहेत.
या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले संबंध पुनरावलोकन करत काही कठोर राजनैतिक निर्णय घेतले आहेत. मिस्री म्हणाले की, भारताला विश्वसनीय गुप्त माहिती मिळाली होती की पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरून आणखी हल्ले घडवून आणले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ही कारवाई अत्यंत संयमित, नियोजित आणि जबाबदारीने करण्यात आली असून तिचा उद्देश केवळ दहशतवाद्यांची पायाभूत रचना उद्ध्वस्त करणे हाच होता.
संयुक्त राष्ट्रसंघानेही पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींना जबाबदार धरण्याचे आवाहन केले आहे. मिस्री यांनी सांगितले की, भारताची भूमिका आता अधिक ठाम आहे. “आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही.”
पाकिस्तानच्या भूमीवरून उगम पावणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्धार भारताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर व्यक्त केला आहे.
Operation Sindoor was launched after receiving information that Pakistan was planning to carry out more terrorist attacks, Foreign Secretary Vikram Misri clarified India’s position
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत