विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाकिस्तानने शस्त्रसंधीची भीक मागितली, भारताला थांबवण्याची हिम्मत कोणालाही झाली नाही, असे ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत चर्चेत लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.
लोकसभेत ‘पहलगाम हल्ला’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आक्रमक भाषण करत काँग्रेसवर आणि पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या १ तास ४० मिनिटांच्या भाषणात म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही.” पंतप्रधान म्हणाले की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला पाकिस्तानविरुद्ध कारवाई थांबवण्यास सांगितले नव्हते. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला हल्ला थांबवण्याची विनंती केली होती, कारण ते आमच्या हल्ल्याला तोंड देऊ शकले नाहीत.
पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की १० मे रोजी झालेली शस्त्रसंधी ही आंतरराष्ट्रीय दबावामुळे नव्हे, तर पाकिस्तानच्या घाबरटपणामुळे झाली.अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे . डी. व्हान्स यांनी मध्यरात्री फोन करून मोठ्या पाकिस्तानी कारवाईच्या शक्यतेबाबत माहिती दिली होती. त्यावेळी मी सैन्य अधिकाऱ्यांसोबत मीटिंगमध्ये होतो. त्यांना स्पष्ट सांगितलं की जर पाकिस्तानने हल्ला केला, तर ‘गोळीला उत्तरगोळ्यानेच दिला जाईल’,”
पंतप्रधानांनी पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा उल्लेख करत स्पष्ट केलं की हा हल्ला धार्मिक द्वेषातून झाला होता. ही दहशतवादाची कृती नव्हती, तर हिंदू यात्रेकरूंना ठार मारून दंगल भडकवण्याचा प्रयत्न होता. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे,”
मोदी यांनी काँग्रेसवरही टीका करत सांगितले की, १९३ देशांपैकी १९० देशांनी ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला, पण भारतातच काँग्रेसने सैन्याच्या कारवाईवर संशय घेतला.आपले सैनिक पाकिस्तानवर कारवाई करत असताना, काँग्रेसने त्यांच्यावरच शंका घेतली.”
पंतप्रधानांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंवर निशाणा साधताना सिंधू जल कराराला ‘भारताच्या पाण्याच्या सुरक्षेवरील गद्दारी’ असे संबोधले. नेहरूंनी नद्यांचे हक्क पाकिस्तानला दिले आणि वर त्यांना धरणं बांधण्यासाठी पैसेही दिले,” असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान म्हणाले, “जिथून दहशतवादी येतात, त्या देशाला आपण ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ दर्जा कसा देतो? जेव्हा मुंबईवर हल्ला झाला, १७० भारतीय मारले गेले, तेव्हा काँग्रेस सरकारने एकाही पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याला देशाबाहेर काढले नाही.