विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला त्या महिलांना पुढे आणून, आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे की आमच्या देशातील महिला कोणापेक्षाही कमी नाहीत, असे मत प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वाराणसीत राष्ट्रीय महिला आयोगाने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात देशभरातून आलेल्या वक्त्यांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आजही त्या किती प्रेरणादायी आहेत, हे अधोरेखित केले.
यावेळी डॉ. कुमार विश्वास यांचे व्याख्यान झाले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अध्यक्षस्थानी होते.
कुमार विश्वास मराठा साम्राज्याच्या महान शासक अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण करताना म्हणाले की, आजच्या शाळांमधील मुलांना त्यांच्याबद्दल फारसे माहिती नाही, परंतु त्यांचे नाव आणि कार्य पुनरुज्जीवित करण्यासाठी चालवली जाणारी मोहीम येणाऱ्या काळात खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही हजार वर्षे जुनी कोणतीही मूर्ती शोधा, सगळीकडे स्त्री देवी तिच्या अर्धांगिनीसोबत दिसेल. यावरून असे दिसून येते की भारतात महिलांना नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे. अहिल्याबाईंनी असेही म्हटले होते की, ही वेदांची भूमी आहे, येथे पूजा प्रथम आईपासून सुरू होते. तरीही आपल्यावर महिलाविरोधी असल्याचा आरोप केला जातो, जो खरा नाही. अहिल्याबाई होळकर म्हणजे भारतातील आदर्श राजकारण, धर्मनिष्ठ सेवा आणि निःस्वार्थी प्रशासनाचं अपूर्व उदाहरण आहे. त्यांचं नाव घेताना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान निर्माण होतो.
अहिल्याबाईंच्या धाडसी दृष्टिकोनाबद्दल कुमार विश्वास यांनी एक प्रसंग सांगितला की, एकदा एक योद्धा सीमा ओलांडत असताना अहिल्याबाई राघवाला म्हणाल्या की मी हत्तीवर बसून येत आहे आणि माझ्या मैत्रिणी घोडीवर बसून येत आहेत, जर आम्ही तुम्हाला पराभूत केले तर तुमचा अपमान होईल.
विजयाताई रहाटकर म्हणाल्या, अहिल्यादेवींचं जीवन म्हणजे नारीशक्तीच्या उत्कर्षाचं प्रतीक आहे. त्यांनी केवळ राज्यकारभारात न्यायनिष्ठा ठेवली नाही, तर मंदिरे, घाट, धर्मशाळा यांसारख्या जनहिताच्या गोष्टींवर भर दिला. आजच्या काळात महिलांनी त्यांचं अनुकरण करावं, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”