विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ८ जागांसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. तामिळनाडू ६ आणि आसामध्ये २ जागा जून, जुलैमध्ये रिक्त होत आहे. ज्यासाठी १९ जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाईल. Rajya Sabha
राज्यसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जारी केली जाईल. ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दिली जाईल. प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्या यावर एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांची गरज असते ते ठरते. तामिळनाडूत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी ३४ मतांची गरज आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण २३५ जागा आहेत आणि २३४ आमदार आहेत. या राज्यात सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम पक्षाकडे १३३ आमदार आहेत. Rajya Sabha
काँग्रेसकडे १७, वीसीकेकडे ४ आणि डाव्या पक्षांकडे ४ आमदार आहेत. विरोधी पक्ष एआयडीएमकेकडे ६६ आमदारांसह भाजपाचे ४ आमदार आहेत. तामिळनाडूत ६ राज्यसभेच्या जागांपैकी ३ डीएमकेकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ३४ मतांची गरज आहे. डिएमके आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे एकूण १५८ मते आहेत. त्यामुळे ४ जागांवर त्यांचा विजय पक्का आहे. एआयडिएमके एका जागेवर सहज विजयी होईल परंतु दुसऱ्या जागेसाठी त्यांना भाजपाच्या ४ मतांची गरज आहे. त्यामुळे एका जागेवर तामिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे.
आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागा आहेत. भाजपाकडे ६४ आणि सहकारी पक्षाकडे १६ जागा आहेत. त्यामुळे भाजपा आघाडीचे संख्याबळ ८० आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४३ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपाचा एका जागेवर विजय निश्चित आहे. परंतु दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना २२ मतांची गरज आहे. जर भाजपाच्या मित्रपक्षांचा १६ आकडा पकडला तरी ३६ मते त्यांच्याकडे आहेत. त्यांना ६ अतिरिक्त मतांची गरज भासेल. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसकडे २६, सीपीआय १, एआययूडिएफकडे १५ आणि बोडोलँडकडे ३ आमदार आहेत. जर या पक्षांनी काँग्रेसला साथ दिली तर त्यांचे संख्याबळ ४५ इतके होते. त्यामुळे राज्यसभेची दुसरी जागा ते जिंकू शकतात.