विशेष प्रतिनिधी
पुणे : आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) तीन भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड येथील संतपीठाचे उद्घाटन झाल्यावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपांवर म्हणाले, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने तीन भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.
मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा आहे. एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना 3 वर्षे चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी भाषा आपण यापूर्वी अनिवार्य केली होती. पण काल काढलेल्या जीआरद्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. आता आपण असे म्हटले आहे की, कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. 3 भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याशिवाय दोन भाषा व त्यातील एक भारतीय भाषा असावी असे हे सूत्र आहे. यापैकी एक भाषा म्हणून लोक इंग्रजीला प्राधान्य देतात. त्यानंतर कुठलीही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी म्हटले होते. कारण, आपल्याकडे हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्यासाठी 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देता येईल. ऑनलाईन पद्धतीनेही ट्रेनिंग दिले जाईल.
आपण सर्वजण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीहून चांगल्या आहेत. इंग्रजी ही व्यवहार्य भाषा झाली आहे हे ठीक आहे. पण नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता आपण इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीत शिकवायला लागलो. यापूर्वी असे होत नव्हते. वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षणही मराठीत दिले जात आहे. एमबीएही मराठीत शिकवले जात आहे. म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठीला वैश्विक भाषा, ज्ञान भाषा व अर्थकारणाची भाषा बनण्याचे दालन उघडे झाले आहे. महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वाद योग्य नसल्याचे मला वाटते, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी यावेळी भाजपमध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षाच्या नियमानुसार वागण्याचाही सल्ला दिला. सुधाकर बडगुजर यांच्यावर आमच्या नेत्यांनी टीका केली होती हे खरे आहे. नीतेश राणे यांनी यासंबंधी एक व्हिडिओ रीलिज केला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशीनंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. हे सर्वकाही विधानसभा निवडणुकीपूर्वी घडले आहे. कुणी पक्षात येत असेल तर आपण निश्चितपणे त्यांचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल? वागण्याची पद्धत काय असेल? ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती-नियमांनी वागले पाहिजे, असे ते म्हणाले.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला कुणाचाही विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, काल पक्षप्रवेश ठरला, त्यावेळी आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या संदर्भात सकाळी कल्पना नव्हती की कालच प्रवेश आहे. नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सर्वांना समजावले होते की, आपल्याला बडगुजर यांना का प्रवेश द्यायचा आहे. बावनकुळे यांचा कुठेही पक्षप्रवेशाला विरोध नव्हता. गिरीश महाजन यांनी ज्यावेळी सांगितले की, आपण आजच त्यांचा प्रवेश करणार आहोत, तेव्हा ते स्वतः प्रवेशाला हजर राहिले. त्यामुळे मला असे वाटते की, हा फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता, असे ते म्हणाले.
Hatred of Indian languages is wrong, Raj Thackeray’s insistence on two languages is wrong, Chief Minister clarified
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी