विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र आज देशातील स्टार्टअप राजधानी म्हणून उदयास आला असून, भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकूण स्टार्टअप्सपैकी ४५ टक्के महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, हे महिलांच्या नव्या उद्योजकीय क्रांतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. Devendra Fadnavis
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठाच्या परिसरात झाले. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Devendra Fadnavis
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज महाराष्ट्रात सुमारे १८ टक्के स्टार्टअप्स भारताच्या एकूण संख्येत आहेत. त्यापैकी ४५ टक्के महिला उद्योजिकांच्या नेतृत्वाखाली चालतात. ही संख्या पुढील काही वर्षांत पुरुषांच्या तुलनेत अधिक होईल, आणि उद्योगजगतामध्ये महिलांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. जर भारताने ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठायचा असेल, तर महाराष्ट्राने ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न महिलांच्या खांद्यावरच पूर्ण होईल.”
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “नवकल्पना केवळ नवीन उत्पादने तयार करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती जीवन अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवते. जेव्हा एखादी कल्पना बाजारपेठेत रुपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला नवी गती देते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा अॅनालिटिक्स यामुळे नव्या कल्पनांना व्यावहारिक रूप मिळत आहे. राज्य सरकार सार्वजनिक विद्यापीठांमधील इनक्यूबेशन सेंटर्सना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून तरुणांना उद्योजकतेची संधी मिळेल.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सवर विशेष भर दिला जाईल, असेही स्पष्ट केले. “महिला उद्योजिका ही केवळ व्यवसायाचा नाही, तर समाजातील परिवर्तनाचा आधार आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि धैर्याला शासनाचे बळ देण्यात येईल,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्राँग पामे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, तसेच ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महिला स्टार्टअप संस्थापकांनी आपले नवकल्पना-आधारित प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम सादर केले. काही स्टार्टअप्सनी महिला सुरक्षेसाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी, ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन मॉडेल, तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांवरील संशोधन यांसारखे उपक्रम सादर केले, ज्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री म्हणाले,“महाराष्ट्र हे केवळ उद्योगाचे केंद्र नाही, तर नवकल्पना, तंत्रज्ञान आणि महिला उद्योजकतेचे नेतृत्व करणारे राज्य आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्स हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीचे नवे इंजिन ठरणार आहेत.”
45% of Maharashtra’s Startups Led by Women, State Will Emerge as a ‘Startup Capital Driven by Women,’ Says CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















