विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्य सरकारने 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी तोडगा नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी दिली जाईल असे सरकार म्हणत होते, ती योग्य वेळ 2028 आणि 2029 मध्ये असू शकली असती ती 2026 मध्येच सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येत आणली. हे आमच्या आंदोलनाचे सर्वांत मोठे यश आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा येईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही कर्जमाफीचे बोललो नाही असे अजित पवारांनी म्हटले. तर 5 वर्षांमध्ये कधीतरी कर्जमाफी करू मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. आता त्यांना आम्ही तारखेपर्यंत आणले आहे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली म्हणून सरकारचे कौतुक आहेच पण जर काही कट कारस्थान केले तर कोणालाही सोडणार नाही.
आमच्या आंदोलनाबद्दल मनोज जरांगे यांना काय वाटते हे त्यांनी सांगितले असेल. त्यांनी उपोषण सोडले तेव्हा बरेच लोकं असेच बोलत होते. त्यांनी कोणत्या भावनेतून बोलले हे आम्ही समजून घेऊ. आता जी कर्ज माफी झाली आहे ती मार्च 2026 पर्यंत असणाऱ्या कर्जाची होणार आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जुन 2026 मध्ये कर्जमाफी होणार याचे अनेक फायदे आहेत. ते समजणाऱ्यांना समजेल. ज्याला शेंगदाण्याची चव माहिती नाही तो जर काजूची चव सांगत असेल तर आपण काय करणार. आज आपण सगळ्या गोष्टी समजून घेतले पाहिजे. घरातून बाहेर न पडलेले, कधीही आंदोलन न केलेले लोकं आज सोशल मीडियावर कमेंट करत आहेत, आम्ही मेहनत करत लागेल तेवढे गुन्हे अंगावर घेतले त्यामुळे आरोप करणाऱ्यांशी आम्हाला काही देणं घेणं नाही.
बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी करत आहोत त्यानंतरही काही जण आरोप करत असतील तर आम्हाला काही बोलायचे नाही. शेतकऱ्यांसोबत दगाफटका झाला तर मी फासावर जायला तयार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मी फासावर जायला तयार आहे पण आता माघार घेणार नाही. सरकारने आम्हाला फसवले असे कराळे मास्तरांना का वाटते माहिती नाही.ते बैठकीला येणार होते ते आले नाही, ते काही नाराज नाही. ते काही इतके लहान माणूस नाही मी त्यांची भेट घेतो. लोकं आंदोलनकर्त्यांवर टीका करत आहे, असे विचित्र प्रवृत्तीचे लोकं जन्माला आले आहेत.
बच्चू कडू म्हणाले की, आमच्या आंदोलनकर्त्यांवर जर गुन्हे दाखल करत असतील तर त्यांना अटक करावी आम्ही तयार आहोत. आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होणारच.सरकार नमवण्याचा प्रयत्न करेल. इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होत आहे दुसरीकडे गुन्हेही दाखल होत आहे. हे कुठला प्रकार आहे. 30 जून पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफी होईल ही रणनिती आमच्या नेत्याने खेळलेली आहे. यामुळे अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात जो पर्यंत पैसा जाणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. नजर थोडी जरी इकडे तिकडे केली तर आम्ही इथेच उभे आहोत असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे. अभी हम जिंदा है, असेही त्यांनी म्हटले आहे.
Bacchu Kadu Rejects Settlement, Vows to Continue Protest Until Farmers Receive Payment
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				 
													



















