विशेष प्रतिनिधी
मुंबई :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. मात्र, या हालचालींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष — शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस — यांच्यातील एकात्मतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडेट्टीवार म्हणाले, “आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचा विचार सध्या तरी नाही. मुंबई महापालिकेत सध्या भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. खिरापतीसारखा पैसा वाटला जातो आहे. महापालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या आणि जनतेच्या प्रश्नांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत.
त्यांनी सांगितले की, “काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करूनच स्थानिक नेत्यांना स्वबळावर लढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी आणि जनतेशी थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता.”
या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून काही प्रमाणात अंतर ठेवण्याचा संकेत दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनीही अशीच भूमिका घेतली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाच ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती.”
मुंबई महापालिकेवरील सत्ता ही राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक आहे. २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही महापालिका आता सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा स्वतंत्र लढाईचा निर्णय महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण करणारा ठरू शकतो.
दरम्यान, काँग्रेसच्या गटांमधील काही नेते या निर्णयाचे समर्थन करत आहेत. त्यांचा दावा आहे की, “आघाडीच्या नावाखाली काँग्रेसला सतत कमी जागा मिळतात, त्यामुळे पक्षाचे अस्तित्व कमकुवत होते. आता स्वतंत्र लढा देऊन काँग्रेस मुंबईत पुन्हा आपले गड मजबूत करेल.”
मात्र, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या घोषणेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Cracks in Maha Vikas Aghadi: Congress to Contest Mumbai Civic Polls on Its Own Strength
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















