विशेष प्रतिनिधी
नाशिक : पुढच्या काही दिवसात ठाकरे गटात आणखी एक भूंकप होऊ शकतो, असा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेला दावा खरा ठरण्याची चिन्हे आहेत. नाशिक मधील ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी आपण पक्षात नाराज असल्याचे सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला घरघर लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज माध्यमांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी ‘हो, मी पक्षात नाराज आहे’ असं सांगितलं.
सुधाकर बडगुजर म्हणाले,, “मीच नाही, तर पक्षात 10 ते 12 जण नाराज आहेत. संजय राऊत यांच्यावर नाराजी नाही. पक्ष संघटनेत बदल करतांना विश्वासात घेतले नाही म्हणून नाराजी आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत.
पक्षासाठी एवढं काम केलं. आम्ही वातावरण बदलवून खासदार निवडून आणला. याबाबत वेळोवेळी वरिष्ठांना सांगितलं. अनेकदा सुधारणा करावी अशी मागणी केली. पण अजून काही बदल दिसत नाही. विलास शिंदेंची इच्छा होती, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा. पण तसे झाले नाही. माझी नाराजी स्वतःवर आहे” असं सुधाकर बडगुजर म्हणाले.
“संघटनेतील काही फेरबदलामुळे अनेकजण नाराज आहेत. विलास शिंदेसोबत मी काम केलेलं आहे. राजाभाऊ वाझेंची ज्यावेळी उमेदवारी झाली तेंव्हा आम्ही काम केलं. विरोधकांचं वार असतानाही राजाभाऊ वाझे निवडून आले. विलास शिंदेंची इच्छा होती, त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. माझी नाराजी कोणावर मी स्व:त नाराज आहे. निर्णयाबद्दल अजून काही ठरलं नाही” असं सुधाकर बडगुजर म्हणाले.