विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज याना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधीची मजल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत गेली असून हे निंदाजनक आहे. त्यांनी माफी मागावी, अशो मागणी त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एकीकडे देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत असताना दुसरीकडे, राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला आहे. जयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच शिवाय महाराष्ट्रातील शिवभक्तांचाही अपमान आहे. ही सगळी वक्तव्ये जाणीवपूर्वक होत असतात. महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा त्यांचा हेतू आहे. वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांची मजल आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत गेली. हे चुकून झालेले नाही. हे निंदाजनक वक्तव्य असून राहुल गांधींनी याबद्दल माफी मागायला हवी.
शिंदे म्हणाले, सिडको अतिशय उत्तम गुणवत्तेची घरे तयार करत असून नागरिकांना ही घरे परवडणाऱ्या किमतीत मिळत आहेत. यामध्ये आज २१ हजार लोकांना घरे मिळाली आहेत. म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरी प्रक्रियेत पारदर्शकता असून लोकांच्या समोरच लॉटरीची सोडत काढली आहे. त्यामुळे लोकांना चांगल्या गुणवत्तेची घरे मिळाली आहेत. ज्यांना घरे मिळाली त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी नाही मिळाली त्यांच्यासाठी आम्ही पुढच्या तीन आठवड्यात पुन्हा लॉटरी काढणार आहोत.
गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून हाऊसिंगचे नवीन धोरण आम्ही आणत आहोत. यामध्ये परवडणारी भाड्याची घरे, वर्किंग वुमेन हॉस्टेल, विद्यार्थी होस्टेल, जेष्ठ नागरिक, गिरणी कामगार, पोलिस यांच्यासाठी घरे तसेच मुंबईतील डबेवाल्यांसाठी घरे या सगळ्याचा अंतर्भाव असलेले नवीन धोरण आम्ही तयार करत आहोत. यात क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक नवीन पॉलिसी आम्ही आणणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचा सप्लाय सुरु होईल आणि लोकांना परवडणारी घरे मिळतील.