विशेष प्रतिनिधी
मुंबई : “लोकसभा निवडणुकीत महायुतीसमोर लढण्यासाठी राज्यात एकही सक्षम राजकीय विरोधक नव्हता. काँग्रेसने तर निवडणुकीच्या लढाईतला आत्मविश्वासच गमावला होता. त्यामुळेच त्यांच्या जागी काही अराजकतावादी संघटनांना पुढे करून ही निवडणूक लढवण्यात आली,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात मांडले.
फडणवीस म्हणाले की, कोणतीही निवडणूक ही राजकीय पक्षांमध्येच व्हावी, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत ही लढाई महायुती विरुद्ध काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी नव्हे, तर अराजकतावादी विचारांच्या संघटनांमध्ये झाली. “राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काही संघटनांना पुढे करून ही निवडणूक लढवण्यात आली. विशेष म्हणजे यातील अनेक संघटनांवर याआधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात बंदीही घालण्यात आली होती,” असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा प्रकार राज्यात पाहायला मिळाला. काही अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये विशिष्ट पद्धतीने मतदान घडवून आणले गेले. हिंदू मुलींशी लग्न करून त्यांना सोडून देण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.”
“अशा अराजकतावादी विचारधारेविरोधात आमच्याकडे लढण्याचा अनुभव नव्हता. म्हणूनच विधानसभा निवडणुकीआधी मी राष्ट्रीय विचारसरणीच्या संघटनांना – ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही प्रमुख संस्था आहे – आवाहन केले की अशा प्रचाराला प्रतिउत्तर द्या. त्यांच्या योगदानामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला विक्रमी यश मिळाले,” असे फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यांविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, “शरद पवार पराभवाने खचत नाहीत. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यशैलीचे मी मनापासून कौतुक करतो. पृथ्वीराज चव्हाण यांची अभ्यासूवृत्ती, नारायण राणे यांचा प्रशासनावर असलेला वचक हे तीनही गुण प्रशंसनीय आहेत.”
एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यातील संवादाबाबत त्यांनी थेटपणे सांगितले, “दोघांनी मला क्षमा करावी, पण ते संवाद साधणारे नेते नाहीत. महत्त्वाच्या प्रश्नांवर दोघांचे संवाद कमी आहेत.” मात्र, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन शिंदे चांगल्या पद्धतीने करू शकतात, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी मुलीच्या अटकेवर न्यायालयाने राज्य सरकारवर टीका केली होती. यावर फडणवीस म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर सुरू असताना देशविरोधी मतप्रदर्शन केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप होता. पोलिसांनी कायद्याचे पालन करून कारवाई केली. न्यायालयाचे आदेश आमच्यासाठी बंधनकारक आहेत.”
Lack of capable opposition in front of the Mahayuti, fight only with anarchist organizations in the Lok Sabha, says Chief Minister Devendra Fadnavis