विशेष प्रतिनिधी
बीड : खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सगळ्यात मोठा गु्न्हेगार आहे. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे. त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये.
एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड यानं आवादा कंपनीकडं खंडणी मागितली असल्याचा आरोप होत आहे. त्याच दिवशी वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या केजमधील कार्यालयात आला होता.
यावेळी वाल्मिक कराडसोबत सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे सोबत असल्याचं फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. यावर जरांगे म्हणाले, काल सीसीटीव्ही मिळाले. यापेक्षा काय पुरावा हवा आहे ? खुनातील आणि खंडणीतील आरोपी एकच आहेत. त्यांच्यावर मोक्का दाखल करा आणि सर्वांची नार्को टेस्ट करा. आरोपी फरार झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे सहआरोपी होणं गरजेचं आहे.
न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल. एवढे मोठे पाप करणारे लोकं राज्यासाठी घातक आहेत
मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे असा इशारा देत जरांगे म्हणाले, गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना पाठीशी घालणार असाल तर हा महाराष्ट्राला कलंक आहे . मुख्यमंत्र्यांना आपलं कुटुंब म्हणून देशमुख कुटुंबाकडे पाहावं लागणार आह
तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. मी संतोष देशमुख यांना न्याय मागतो तर मी जातीयवादी आहे का? वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे.