विशेष प्रतिनिधी
मुंबई : जे ईडीला घाबरून भाजप, शिंदे गटात किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक पाठवलेले आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
पात्र चाळ घोटाळ्यात ईडीकडून अटक झाल्यावर शंभर दिवस कारागृहात असताना खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे नुकतेच प्रकाशन झाले. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. अनेकांना या पुस्तकाच्या प्रति पाठवल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना व्यक्तिगत पत्र लिहून हे पुस्तक पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक पाठवले आहे. माणसाने संकट काळात पळून न जाता कसे आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि लढायला पाहिजे हे त्यांनी यातून शिकावे. देवेंद्र फडणवीस यांनाही हे बालसाहित्य पाठवले आहे. जे ईडीला घाबरून भाजप, शिंदे गटात किंवा अजित पवारांकडे गेलेले आहेत अशा सगळ्यांना हे पुस्तक पाठवलेले आहे. .
नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. आम्हाला तीनदा पुस्तक छापावे लागले. दहा दिवसांमध्ये पुस्तक तीन वेळा छापावे लागले हा मराठी पुस्तकांच्या बाबतीत विक्रमी प्रसंग आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद जुलै महिन्यामध्ये दिल्लीत प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
राऊत म्हणाले की, “दिल्लीत गेल्यानंतर हे पुस्तक प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देता येईल याचीही व्यवस्था आम्ही करू. त्यांच्यासाठीच हे पुस्तक हिंदी तसेच इंग्रजीमध्ये अनुवाद करत आहोत. या पुस्तकाचा जो गाभा आहे, आत्मा आहे तो देशभरात पोहोचला पाहिजे. याचे कारण असे आहे की, ज्या पद्धतीने सगळ्या विरोधकांवर अन्याय केला गेला आणि त्यातले काही लोक आमच्यासारखे उभे राहिले. मी, दिल्लीत संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना फार त्रास दिला हे जनतेला कळायला हवे. एवढे सगळे घाव झेलूनही आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठामपणे उभे आहोत.