विशेष प्रतिनिधी
येवला : Bachchu Kadu प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रणांगणात उतरून नाशिक जिल्ह्यातील येवला येथे भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढला. कांदा आणि मका यांच्या पडत्या भावाविरोधात आयोजित या आंदोलनात शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते.Bachchu Kadu
पुरणगाव येथून मोर्चाची सुरुवात झाली असून बच्चू कडू यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचताच वातावरण तापले. संतप्त शेतकऱ्यांनी निषेध म्हणून कार्यालयाच्या आवारात कांदे फेकले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.Bachchu Kadu
यानंतर बच्चू कडू यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या देत प्रशासनावर दबाव वाढवला. कांदा आणि मक्याला हमीभाव द्यावा, भावांतर योजना तातडीने लागू करावी, यासह शेतकऱ्यांच्या ९ प्रमुख मागण्यांवर ते ठाम राहिले.
आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत लेखी आश्वासन दिले. त्यानुसार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, “आश्वासन पाळले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू,” असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.