विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात अधिकारी करत असलेल्या प्रभाग रचनेबद्दल आम्हाला विश्वास नाही. अमित शहा यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. त्यामुळे अमित शहा आणि त्यांचा पक्ष ‘एसंशि’ कोणत्याही थराला जाईल. मात्र, आम्ही ते होऊ देणार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. ही प्रभाग रचना करणारे अधिकारी, सरकार आणि निवडणूक आयोग, यावर कोणाचाही विश्वास नाही. हे आम्ही विधानसभेला पाहिले आहे. आपल्याला सोयीचे ठरेल, अशा पद्धतीने वार्ड फोडले जातील. तशाच प्रभाग रचना केल्या जातील. त्याचा फायदा निवडणुकीत मिळवला जाईल. या पद्धतीने काम करणारे सरकार आहे. पैशांची ताकद देखील त्यांच्याकडे प्रचंड आहे. प्रशासनावर दहशत निर्माण केली जाईल, हे सत्य आहे. त्यामुळे कोणी यावर आक्षेप घेतला असेल तर त्याकडे गांभीर्यांने पाहायला हवे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
प्रभाग रचना करताना निपक्षपणाने काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने जागल्याची भूमिका घ्यायला हवी. आयोगाने सरकारला दिलेल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर तर होत नाही ना. हे पाहायला हवे. महानगरपालिकेचे खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. ते सरळ गृहस्थ नाहीत. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. त्यांना मुंबईवर कोणत्याही परिस्थितीत ताबा मिळवायचा आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाईल, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये आजही महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. मात्र हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्यामुळे स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, त्याचा विचार करणार आहोत. काही लोकांना काँग्रेस सोबत जावे असे वाटते, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावे असे वाटते. तर काही ठिकाणी वेगळा विचार करण्याचा देखील कार्यकर्त्यांचा विचार आहे. त्यामुळे या संदर्भात लवकरच उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीमध्ये महा विकास आघाडी अत्यंत ताकदीने लढली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हुकूमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो. ती लाट विधानसभेला देखील होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार जाणार, अशा प्रकारचे वातावरण होते. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचे कारण सर्वांना माहिती आहे. राहुल गांधी यांनी याच विषयावर प्रखर भाष्य केले आहे. ते सत्य देखील आहे. त्यामुळे आता कोण जबाबदार आहे? यासाठी दुसऱ्यांवर खापर फोडणे बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे काम केले आहे. त्यामुळे आता दोष देणे योग्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. जागा वाटपामध्ये काही वाद होते. विधानसभेच्या जागा वाटपात काही वाद निर्माण झाले होते आणि ते चुकीचे होते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादी विरोधी लढ्याचे कौतुक केले आहे. मात्र, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का? याविषयी लोकांच्या मनात शंका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दहशतवादाचा विमोड करण्यासाठी, पाकिस्तानचे चार तुकडे करण्यासाठी आणि पाकिस्तान पुन्हा उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, यासाठी ऑपरेशन सिंदूर होते. त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिकेमध्ये आर्मी डेच्या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित केले गेले आहे. हे कशाचे लक्षण मानायचे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut says, we don’t trust the ward structure being done by the officers
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी