विशेष प्रतिनिधी
Mumbai News : भारतीय जनता पक्षाला शेकडो कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या मेघा इन्फ्रा कंपनीस मूळ तीन हजार कोटींचे कंत्राट 14 हजार कोटींपर्यंत वाढवून दिले गेले. जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात होईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे धोरण आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, भाजपाच्या निवडणूक निधीस ज्यांनी ‘चंदा’ दिला, त्या यादीत मेघा इंजिनीअरिंगचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे आणि हा सरळ भ्रष्टाचार आहे, पण विरोधकांच्या व्यवहारात भ्रष्टाचार शोधणाऱ्यांना हे 14 हजार कोटी रुपयांचे भ्रष्ट टेंडर दिसत नाही, याचे आश्चर्य वाटते.
मेघा इन्फ्रा कंपनीस मूळ तीन हजार कोटींचे कंत्राट 14 हजार कोटींपर्यंत वाढवून देताना त्या निविदा प्रक्रियेतून लार्सन टुब्रोसारख्या नामांकित कंपनीला पद्धतशीर वगळले गेले. या भ्रष्टाचारावर आता सर्वोच्च न्यायालयानेच हल्ला केला आणि 14 हजार कोटींच्या प्रकल्पांचे टेंडर रद्द करून भ्रष्टाचाराचा मुखवटा फाडला, असे राऊत म्हणाले.
धुळे सरकारी विश्रामगृहात दोन कोटींच्या आसपास रोख रक्कम सापडली. विधिमंडळाच्या अंदाज समिती अध्यक्षांना ‘नजराणा’ म्हणून देण्यासाठी हे पंधरा कोटी जमा करणे सुरू होते, पण जनतेची धाड पडली आणि पळापळ झाली. इतका मोठा मुद्देमाल सापडूनही गृहमंत्री फडणवीस यांनी कोणाला तुरुंगात पाठवले आणि कोणाला बेड्या ठोकल्या? ज्याच्या खोलीत पैसे गोळा झाले तो सरकारी कर्मचारी तसेच ज्या ठेकेदारांनी हा नजराणा गोळा केला, त्यांच्यापैकी एकाचीही साधी चौकशी झाली नाही. ‘‘या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करू’’ हीदेखील फक्त घोषणाच ठरली, अशी टीका त्यांनी केली आहे. Sanjay Raut