बेस्ट साेसायटी निवडणुकीत दारुण पराभवानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने प्रस्तावित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ आले. Raj Thackeray

ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले.

ठाकरे बंधूंचा २१-० ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू होती, अशी माहिती मिळत आहे. नागरिकांचे विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे सांगितले जात असले, तरी बेस्ट निवडणुकीत मनसेसह ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव झाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची ही भेट हाेत असल्याने चर्चा वाढली आहे.



भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवताना फक्त उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते. राज ठाकरे यांच्यावर टीका केली नव्हती. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी नवी चर्चा रंगू लागली आहे.

सकाळी नऊ वाजताच या भेटीचे वृत्त आले. त्याच वेळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत असलेल्या संजय राऊत यांना या भेटीबाबत उत्तरे देताना नाकीनऊ आले. राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटतातच. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. या भेटीबद्दल राज ठाकरेच अधिक सांगू शकतील. दोन मोठे नेते भेटत आहेत. एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे हे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणताय. या भेटीत काय चर्चा झाली, कोणत्या विषयावर काय बोलणे झाले हे राज ठाकरे सांगतील. ते परखड नेते आहेत, अशी सारवासारव संजय राऊत यांनी केली.

राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही, असे संजय राऊत म्हणाले. उद्या माझं काही काम असेल. उद्धव ठाकरे यांचं काही काम असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही. तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, असेही संजय राऊत म्हणाले.

After Crushing Defeat in BEST Polls, Raj Thackeray Meets CM; Sanjay Raut Struggles for a Reply

महत्वाच्या बातम्या