विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला पाठवली गेली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आता मला 100 टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानापुरते मर्यादित आहे. प्रत्यक्षात ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनले आहे, असा संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. Raj Thackeray
राज्य निवडणूक आयोगाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. आयोगाने दुबार मतदारांची समस्या सोडवण्यासाठी नवीन डिजिटल टूल विकसित केल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. त्यांच्या मते, मतदार यादीत ज्या मतदारांची नावे दुबार नोंदवली गेली आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स दाखवले जातील.
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे… दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या… pic.twitter.com/DizmmWTOkH
— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2025
राज ठाकरे म्हणाले, “दुबार मतदार नोंदणी, मतदार यादीतील गोंधळ आणि अनियमितता याबद्दल जर आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचीही इच्छा नाही, तर मग अशा आयोगाचा उपयोग काय? जबाबदारी तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्वही नाकारत आहात, तर अशा पदांवर बसून काय अर्थ आहे?”
महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करत राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने ही पत्रकार परिषद नक्की पाहावी. तुमच्या मतदानाचा अपमान कसा आणि कुठून सुरू होतो हे तुम्हाला स्पष्ट समजेल.”
पत्रकार परिषदेत आयोगाला कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे त्यांनी कौतुक करत म्हटले, “सत्तेच्या दबावात न येता प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”