Eknath Shinde : स्वामी समर्थांनी सांगितलेय की आळशी माणसाचे तोंड पाहू नका, एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना टाेला

विशेष प्रतिनिधी

साेलापूर : घरात बसून फुकटची पाटीलकी करत नाही. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी थेट रस्त्यावर उतरतो. स्वामी समर्थांनी सांगितले आहे की, आळशी माणसाचे तोंड पाहू नका, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.



नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाैरा सुरू आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी शिवसेना आहे. सरकार पडणार… सरकार पडणार… अशी जुनी रेकॉर्ड लावून विरोधक थकले, पण महायुती सरकार ठाम उभे आहे.
मोहोळमध्ये झालेल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मोहोळमध्ये सुरू असलेली गुंडशाही मोडायची असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे या सुशिक्षित, सक्षम आणि कणखर नेतृत्वाला पाठिंबा मिळाल्याची स्पष्ट चिन्हे सभेनंतर दिसून आली. मोहोळसाठी मंजूर ३ हजार कोटींच्या विकास आराखड्याचा उल्लेख करत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि शहर सुशोभीकरणासाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली.
मी आज उपमुख्यमंत्री आहे, पण आधी कार्यकर्ता होतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. आता प्रत्येक शिवसैनिकाने एकनाथ शिंदे बनून घराघरात जाऊन विकास पोहोचवा. सत्ता येते-जाते, पण नाव आणि काम कायम राहते. म्हणूनच लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Eknath Shinde targets Uddhav Thackeray, says Swami Samarth warned against looking at lazy people

महत्वाच्या बातम्या