उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने ५० हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे ३.२ लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमिया मुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे ५ हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.

याशिवाय, २२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.

‘खेलो इंडिया’ अभियानाशी सुसंगत ‘शुभ आरंभ स्पोर्ट्स फॉर एक्सलन्स’ या उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात आले आहे. फुटबॉल आणि कबड्डीसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक, जीवनकौशल्य प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या दशकात सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये मुलींचा सहभाग जवळपास ५० टक्के आहे. परिसरात १० क्रीडांगणे विकसित करण्यात आली आहेत. शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. २७ आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, १२ स्वच्छतागृहे अनेक शाळांमध्ये संरक्षक भिंती, पेव्हिंग ब्लॉक आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ६० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज खर्चात दरवर्षी मोठी बचत होत आहे. तसेच विविध वाड्यांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ झाली आहे.



जलसंधारण क्षेत्रात सहा जलसाठा संरचनांची निर्मिती व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे २,००० लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ ३०० एकरांहून अधिक शेती आणि ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना झाला आहे.

याशिवाय, पुढील दोन वर्षांत २० हून अधिक नवीन जलसंधारण प्रकल्प उभारून सुमारे २,५०० लाख लिटर भूजल पुनर्भरण क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेततळी, बंधारे, बोअरवेल रिचार्ज आणि पर्जन्यजल संधारणासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकस आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी पुणे, सिंधुदुर्ग आणि मुंबई जिल्ह्यातील २३५ शाळांमध्ये पोषण शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि सकस आहाराचा संदेश पोहोचविण्यात आला.

४७० शिक्षकांना ‘हेल्थ अँड वेलनेस अॅम्बेसेडर’ म्हणून प्रशिक्षित करण्यात आले असून, सर्व शाळांमध्ये ‘सेहत क्लब’ स्थापन करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषणविषयक जनजागृतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

पुढील दोन वर्षांसाठी व्यापक कृती आराखडा या उपक्रमाचा पुढील टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, हेल्थ अँड वेलनेस सेंटरची गुणवत्ता वाढविणे, विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन, ग्रामीण क्रीडा विकासासाठी प्रगत प्रशिक्षण, तसेच जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

शासनाच्या विविध योजनांशी प्रभावी समन्वय साधत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण, जलसुरक्षा आणि जीवनमानात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले..

CSR Initiatives Will Strengthen ‘Developed Maharashtra’ Goal: CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या