विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र गृह मंत्रालयाने चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात, दीपक दळवी, पांडुरंग पवार आणि पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढतीची घोषणा केली. मुंबई पोलिसांच्या इतिहासात ८६ एन्काउंटरसाठी प्रसिद्ध असलेले दया नायक, अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध निर्भय कारवायांसाठी ओळखले जाणारे दया नायक ३१ जुलै २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना ही बढती देण्यात आली आहे. १० महिन्यांपूर्वी ते एसीपी पदासाठी पात्र ठरले होते. Daya Nayak
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 मध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर दया नायक होते. निवृत्तीच्या दोन दिवस आधी ते एसीपी झाले आहेत. दया नायक यांची ओळख म्हणजे गुंडांचा कर्दनकाळ. त्यांचा पोलीस दलात एवढा दबदबा आहे आणि होता की गुंड त्यांच्या नावानेही चळचळा कापत असत. अंडरवर्ल्डमधील मोठमोठे डॉन त्यांना घाबरत असत. दया नायक यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडत ८७ गुंडांचे एन्काउंटर केले आहेत. त्यामुळे एन्काऊंटर स्पेशालिस्ट ही त्यांची ओळख बनली आहे.
दया नायक यांचा जन्म कर्नाटकमधील उडुपीमधील. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण कन्नडमध्ये झाले. त्यानंतर १९७९ मध्ये ते मुंबईला नोकरीच्या शोधात आले. मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करत त्यांनी मुंबई महापालिकेच्या गोरेगावमधील शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. हॉटेलमध्ये काम करतानाच त्यांनी अंधेरीतील वालिया कॉलेजमधून (कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी) पदवी घेतली. त्यानंतर प्लंबर अॅप्रेटिस म्हणून काम करू लागले.
त्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क झाला. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या कामाविषयी आवड निर्माण झाली. या पोलिसांशी गप्पा मारताना त्यांना पोलीस दलात येण्याची इच्छा झाली. त्यानंतर ते पोलीस भरतीसाठी गेले आणि १९९५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक बनले. त्यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात होती. १९९० चे दशक होते. त्यानंतर वर्षभरात त्यांनी जुहूमध्ये दोन एन्काऊंटर केले आणि त्यात छोटा राजनचे दोन गुंड मारले. अवघ्या वर्षभरात त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख बनली. कारण त्या काळात मुंबईत अंडरवर्ल्डने डोके वर काढले होते.
दया नायक पोलीस दलात लोकप्रिय झालेले असताना वादामुळेही ते प्रसिद्धीवर स्वार होत गेले. उत्पन्नापेक्षा संपत्ती जास्त असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि त्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली. ते वर्ष होते २००४. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोक्का न्यायालयाच्या आदेशाने दया नायक यांच्या मुंबईसह कर्नाटकमधील घर, मालमत्तेचा शोध घेतला. सहा ठिकाणी छापे घातले तेव्हा अंधेरी आणि कर्नाटकमध्ये (करकला) दोन लक्झरी बस त्यांच्या नावावर असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना अटक झाली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. २०१२ मध्ये त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात नियुक्ती झाली. तर २०१४ मध्ये त्यांचे पुन्हा निलंबन करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये पुन्हा पोलीस सेवेत परतले.
१९९९ च्या कंधार विमान अपहरण प्रकरणात दया नायक यांचे शौर्य विशेष उल्लेखनीय होते. या प्रकरणात १० दहशतवादी भारतात आले होते. त्यापैकी ५ जणांनी एक विमान अपहरण करून ते कंधारला नेले होते. दया नायक आणि त्यांच्या टीमने उर्वरित ५ दहशतवाद्यांचा पाठलाग केला आणि एका एन्काउंटरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईत एके-४७रायफल, रॉकेट लाँचर अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
दया नायक यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाविरुद्ध मुंबई पोलिसांना बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी ८६ एन्काउंटरमध्ये दाऊद इब्राहिम टोळीच्या २२ गुंडांना आणि छोटा राजन टोळीच्या २० गुंडांना कंकाउंटरमध्ये मारले आहे. याशिवाय, त्यांनी लष्कर-ए-तैयबा आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित गुन्हेगारांनाही एन्काउंटरमध्ये मारले आहे.