विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Arvind Sawant आपण खरोखरच विश्वगुरू आहोत, तर ऑपरेशन सिंदूरवेळी एकही देश आपल्या पाठीशी का उभा राहिला नाही? असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान केला.Arvind Sawant
लोकसभेत बोलताना सावंत म्हणाले की, पाकिस्तानला चीन, तुर्की यांसारख्या देशांनी उघडपणे पाठिंबा दिला, ड्रोन दिले. मात्र, भारताच्या बाजूने कोणताही देश पुढे आला नाही. ऑपरेशन सुरू असताना आपल्या शेजारी देशांनीही भारताशी संवाद साधण्याचे टाळले. पंतप्रधान मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला आहे, पण एवढं जागतिक फिरूनही भारतासाठी कोण उभं राहिलं नाही, हे चिंतेचं आहे.Arvind Sawant
इस्रायलच्या बाजूने उभं राहताना भारताने इराणला दूर लोटलं. जो इराण भारताला आधी तेल देतो आणि नंतर पैसे घेतो, तोही देश आता भारतापासून दुरावला आहे . ही सध्याच्या परराष्ट्र धोरणाची अपयशी दिशा आहे, असा आरोप करत सावंत म्हणाले. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताला कुठल्याही आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची साथ मिळाली नाही, ही बाब गंभीर आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये जी शौर्यगाथा लिहिली गेली, ती आपल्या सैन्याच्या पराक्रमामुळेच शक्य झाली. त्यामुळे आम्ही भारतीय लष्कराला सलाम करतो असे सांगून सावंत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर करावं लागण्यामागचं मूळ कारण काय होतं? त्यांनी नमूद केलं की, या कारवाईच्या आधी पहलगाममध्ये गंभीर घटना घडली होती.आपण मंत्री असताना काश्मीरला दौरा केला होता. तेव्हा संपूर्ण काश्मीरमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा दल तैनात होते, पण आश्चर्य म्हणजे, पहलगाममध्ये मात्र त्या दिवशी ना कोणते जवान होते, ना पोलिस. त्या दिवशी असे काय घडलं की, इतक्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षक अनुपस्थित होते? तिथे पोलीस किंवा जवान न ठेवण्याचे आदेश कुणाकडून दिले गेले, याची चौकशी झालीच पाहिजे. पहलगामपासून इतकं दूर असताना, हे अतिरेकी नेमके कुठून आले? नेपाळहून आले होते का?
पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत सावंत म्हणाले की, त्या वेळीचे राज्यपाल सातत्याने केंद्र सरकारला माहिती देत होते, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. राज्यपाल पंतप्रधानांशी संपर्क साधू पाहत होते, पण तेव्हा पंतप्रधान कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये व्यस्त होते. त्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले, त्यामध्ये सहभागी असलेल्या किती दहशतवाद्यांना पकडण्यात आलं, असा सवाल करून सावंत म्हणाले, तुमचं संपूर्ण लक्ष केवळ जनतेच्या भावना भडकवण्यावर आहे. ऑपरेशनलाही तुम्ही ‘सिंदूर’सारखं भावनिक नाव दिलंत. पण खरा प्रश्न असा आहे की, ज्यांचं हे सिंदूर पुसलं गेलं, त्या हल्लेखोरांपैकी किती जणांना अटक करण्यात आली? आणि या सगळ्याच्या पाठीमागे तुम्ही ढोल बडवत फिरत आहात. बिहारमध्ये निवडणूक सभा घेतल्या, राजकीय भाषणं केलीत, पण पहलगामला जाणं शक्य झालं नाही. मणिपूरलाही तुम्ही गेले नाहीत. ही गोष्ट लाजिरवाणी आहे. तुम्ही सतत आत्मप्रशंसा करत असता. आम्हीही ढोल वाजवू, पण आमचं गौरवगान केवळ भारतीय लष्करासाठी असेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये खरोखर काय पराक्रम दाखवला? तुम्ही लष्कराला पूर्ण मोकळीक दिलीत, हे खरं आहे. पण त्यांची ती स्वायत्तता नंतर का काढून घेतली? कोणाच्या आदेशावरून त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्यात आलं, हे सरकारने स्पष्ट करावं. तुमचं म्हणणं आहे की, पाकिस्तानचे अधिकारी तुमच्यासमोर युद्धबंदीची याचना करत होते. जर तसं असेल, तर मग भारताने बिनशर्त मागे का हटावं लागलं? युद्धबंदी झाली, तरी जम्मूतील नागरी भागांवर हल्ले का सुरूच राहिले? आणि त्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सतत बोलत होते की, मी युद्ध थांबवलं. मग खरी सत्यता काय आहे? हे सरकारने सांगायला हवं.