विशेष प्रतिनिधी
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपल्या पत्रातून म्हटले आहे.
दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असे त्या म्हणाल्या.
उषा तांबे यांना खुले पत्र!
@PawarSpeaks
@supriya_sule
@samant_uday
@rajivkhandekar pic.twitter.com/SjUz8bBvod— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2025
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (९८वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन.दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोन्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय ? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी.
नीलम गोन्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.