Narayan Rane मुलांना इंग्रजी शाळेत का टाकले? मराठी माणसासाठी तुम्ही काय केले? नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कथित हिंदी सक्तीवरून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलांना इंग्रजी शाळेत का टाकले? मराठी माणसासाठी तुम्ही काय केले असा सवाल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. Narayan Rane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा देत जीआर फाडला होता. यावरून राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी आहे. त्यांना मराठीचा एवढाच पुळका होता, तर त्यांनी स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात का शिकवली? असा सवाल करत राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण? Narayan Rane



मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

हिंदी सक्तीच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, त्या अहवालात त्यांचा उजवा हात मानला जाणाऱ्या उपनेत्याने पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा असे लिहिले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले. त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू. महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.

फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयी मोर्चावरही भाष्य केले. ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. फक्त राज ठाकरे यांनी पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची सक्ती करण्याचा निर्णय तुमच्या काळात का घेण्यात आला हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, टेनिस खेळावे, स्वीमिंग करावी, जेवण करावे आम्हाला काही अडचण नाही.

Why did you send your children to English schools? What have you done for the Marathi people? Narayan Rane questions Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या