विशेष प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर आता उध्दव ठाकरे यांच्यासमाेरील अडचणी आणखी वाढणार आहेत. बेस्ट पतपेढीत झालेल्या भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करणार आहोत, असा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी विरोधकांना दिला आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलला 21 पैकी 14 जागा मिळाल्या. यानंतर त्यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास दादर येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत आमचा झालेला मोठा विजय आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला मिळालेली खरी पोचपावती आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीतील विजयाचे संपूर्ण श्रेय युनियनला दिले आहे.
शशांक राव म्हणाले की, शिवसेनेने त्यांच्या सत्ताकाळात बेस्ट उपक्रमात खाजगीकरण आणले. तसेच, बेस्टमध्ये कामगारविरोधी धोरणे राबवली. मात्र बेस्ट पतपेढीत जो काही भ्रष्टाचार झाला त्यातून कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून आली आहे. त्यामुळेच बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. परंतु आता आमचे पॅनल बेस्टच्या पतपेढीवर निवडून आले आहे. त्यामुळे आमचे पहिले टार्गेट बेस्ट पुन्हा पूर्वीप्रमाणे कशी चालेल याकडे लक्ष असेल. सामंजस्य करार केल्या प्रमाणे उपक्रमात 3337 बसेस ताफ्यात कशा लवकरात लवकर आणता येतील, ते पाहणार आहोत. तसेच 2022 पासून बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या कामाचाऱ्यांची देणी देणे बाकी आहे. ती त्यांना लवकर कशी देता येतील, तसेच बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात कसा लवकर विलीन करता येईल, हे आम्ही पाहणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शशांक राव म्हणाले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी तत्काळ त्यांना मिळायला हवी. ती बेस्टकडेच जमा असते. मात्र बेस्ट व पालिकेतही सत्तेवर असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ती ठेकेदारांना काढून दिली. त्यामुळे आज बेस्टकडे सेवा निवृत्त कामगारांची हक्काची ग्रॅच्युइटी देण्यासाठी सुद्धा तेवढे पैसे नाही. तसेच मागील नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे त्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही करण्यात येईल, असा इशारा देताना शशांक राव म्हणाले की, पतपेढीवर सहकार समृद्धी पॅनलचे 7 जण निवडून आले आहेत. आम्ही त्यांना सोबत घेऊन पतपेढीचे कामगारांच्या हितासाठी व त्यांच्या पसंतीस उतरेल असे काम करू.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी पालिकेत त्यांची सत्ता होती. त्यानंतर 2019 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. पण अडीच वर्षात त्यांनी बेस्टचे प्रश्न काही सोडवले नाहीत. त्यामुळे आज बेस्ट व कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे ते आम्हाला जवळचे वाटतात. तशी त्यांची मदत कामगार हितासाठी घेणे चूक नाही. कारण माझे पिताश्री कामगार नेते शरद राव हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांची वेळोवेळी कामगारांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यात त्यांना (शरद राव) मदत झाली, अशी आठवणही शशांक राव यांनी यावेळी सांगितली.
Thackeray Faction’s BEST Credit Society Dealings, Warns Shashank Rao
महत्वाच्या बातम्या
- Pune Municipal Corporation elections:पुणे महापालिका निवडणूक: आरक्षण सोडत जाहीर, १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव
- कृत्रिम बुद्धीमत्तेच्या लाटेतही यशस्वी होण्याची भारतीयांमध्ये क्षमता, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Rohit Pawar alleges Sanjay Shirsat:सिडको भूखंड वाटपात 5000 कोटींचे सरकारी नुकसान, रोहित पवार यांचा संजय शिरसाट यांच्यावर आरोप
- Eknath Shinde : जनतेने वाजवला ब्रँडचा बँड, बेस्ट पतपेढीच्या दारुण पराभवावर एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल