विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी:- कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली असून हा दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा शिल्लक असल्याचे सांगून जिल्ह्यातील उरलेली शिवसेना उबाठा रिकामी करण्याचा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे
माजी आमदार सुभाष बने यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि.प.माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडीक आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या शेकडो सहकार्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करणार आहे.त्यानुसार शनिवारी झालेल्या आभार सभेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश झाले. आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताच पक्षाची ताकद वाढत चालली आहे. आपण सर्वजण एकसंघ राहिलो तर कोणताही मायचा लाल रोखू शकणार नाही. ही ताकद आपण अशीच अबाधित ठेवूया. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले म्हणून काहींच्या पोटात पोटशूळ उठला आहे,.
नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. प्रचार, अपप्रचार झाले मात्र जिल्ह्यातील जनतेने तीन आमदार निवडून दिले. राजापूरातून किरण सामंत, रत्नागिरीतून उदय सामंत, दापोली-खेडमधून योगेश कदम यांना भरभरुन यश मिळाले, असे देखील सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फार मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपासून मोठे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु होती. अखेरीस या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, सौ.रचना महाडीक आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हातात घेतला आहे.
https://youtu.be/MCPIgXMdC0o