विशेष प्रतिनिधी
मुंबई : मैत्रीला थोडंफार जागा. हेच राज ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी पुढे आले होते. त्यांनी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुनावले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी मोदी-शहा यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राणेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर खिल्ली उडवली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही. भाजपा नावाचा महापूर आला आहे. त्यात सर्व वाहून जातील, अशा शब्दात भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज-उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. ज्यानंतर आता मनसे नेत्यांनीही राणेंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना नारायण राणे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. ज्याबाबत उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता? नारायण राणे साहेबांना सांगू इच्छितो की, मैत्रीला थोडंफार जागा. हेच राज ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी पुढे आले होते. त्यांनी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली. सभा घेण्यासाठी तुम्ही राज ठाकरेंना किती फोन केले मला माहीत आहे, असा टोला अविनाश जाधवांनी लगावला.
तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती. याचा अर्थ आमची महाराष्ट्रामध्ये ताकद काय हे कोणी सांगायची गरज नाही, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंना सुनावले आहे. दोन्ही ठाकरे बंधू ताकदवान आहेत. दोन्ही भावांची युती व्हावी ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्तींची इच्छा आहे. ज्या दिवशी हे होईल तेव्हा आगीत तुम्ही तेल का टाकले? असा सवाल भाजपावाले नारायण राणेंना नक्कीच विचारतील, असा चिमटाही अविनाश जाधव यांनी खासदार नारायण राणेंना लगावला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्याव्यतिरिक्त यशवंत किल्लेदार यांनीही राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत, पण ते भाजपाचे बोलके पोपट आहेत. आदित्य ठाकरे बोलले की नारायण राणे बोलतात, ही त्यांची गैरसोय होते. त्यामुळे नारायण राणे यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही राज ठाकरेंना सभा घ्यायला का सांगितली? तुम्हाला फायदा झाला नाही का? असा प्रश्न उपस्थित करत किल्लेदार यांनी राणेंना राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सभेची आठवण करून दिली आहे.